वाशिम : अजय ढवळे
राज्यात बारावीच्या (H.S.C.) परीक्षा सुरू असताना वाशिम जिल्ह्यात सामूहिक कॉपीचा मोठा गैरप्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी विविध केंद्रांवर दिलेल्या भेटीत तब्बल ४४ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले आहेत. विशेष म्हणजे, केवळ विद्यार्थीच नव्हे तर या गैरप्रकाराला खतपाणी घालणाऱ्या १८ केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांवरही प्रशासकीय कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक गैरप्रकार ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मांडवा (ता. रिसोड) येथे आढळले असून तिथे २१ विद्यार्थी कॉपी करताना सापडले. त्यापाठोपाठ वाघमाय देवी आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय, रुई गोस्ता (ता. मानोरा) येथे १७ विद्यार्थी आढळले. याशिवाय बाबासाहेब धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे ३, आप्पास्वामी कनिष्ठ महाविद्यालय, शेंदूरजना येथे २ आणि वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, किन्हीराजा येथे १ विद्यार्थी सापडला आहे.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी खालील कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ परीक्षेमधील गैरप्रकार कायदा १९८२ नुसार कारवाईची शिफारस केली आहे.
मांडवा केंद्र: बी. पी. शिरसाट (केंद्रसंचालक), ए. पी. ठाकरे (मुख्याध्यापक), व्ही. एन. अंभोरे, एम. बी. कोकाटे, ए. एच. कायंदे, एम. पी. इंगळे आणि व्ही. पी. डाखोरे (पर्यवेक्षक).
रुई गोस्ता केंद्र: संतोष माणिक जाधव (केंद्रसंचालक), अतुलदेव निवृत्ती अंभोरे, कु. विपश्यना निळकंठ शिरसाट, गंगाधर सखाराम बोरकर आणि अमीत गजाननराव देशमुख (पर्यवेक्षक).
इतर केंद्र: गजानन मधुकर घुले (केंद्रसंचालक - शेंदूरजना), सुहास महादेवराव शिंदे, प्रतिक राजेंद्र मडावी (पर्यवेक्षक - शेंदूरजना), जयसिंग कपुरा खचकड (प्राचार्य/केंद्रसंचालक - किन्हीराजा), रवी आत्माराम बावीसकर, विशाल किसन ताटके (पर्यवेक्षक - किन्हीराजा), व्ही. पी. राऊत (केंद्रसंचालक - रिसोड), एस. एस. लाव्हरे आणि शेख मो. शाकीर (पर्यवेक्षक - रिसोड).
जिल्ह्यात अजूनही अनेक परीक्षा केंद्रे अशी आहेत जिथे छुप्या पद्धतीने सामूहिक कॉपी सुरू असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, भविष्यात अशा सर्व संशयास्पद परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच 'ब्रेकिंग न्यूज'च्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी अधिक कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.