वाशीम : वाशिम जिल्ह्यात ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला आहे.मालेगाव तालुक्यातील राजुरा शेतशिवारात सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. याच संतापातून स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत राजुरा स्मशानभूमीत अंत्यविधी केला.
पावसाअभावी सोयाबीनची पिकं वाळून गेली. शेंगा भरण्याच्या निर्णायक टप्प्यातच पिकांनी माना टाकल्या. डोळ्यांसमोर उभं पीक करपताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् संताप आहे. राजुरा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त सोयाबीनचा प्रतिकात्मक अंत्यविधी करून चं लक्ष वेधलं. हेक्टरी एक लाख रुपये मदत, पीक विम्याचा लाभ, कृषी पंपांचं वीज बिल माफ करावं आणि कर्जमाफी करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सोयाबीनसोबतच तूर, कापूस,उडीद आणि हळद पिकांवरही दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री गावपातळीवर शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दामू इंगोले (युवा प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी दिला आहे.
खरीपाचे पीक हातचं गेलं. पावसाअभावी आता रब्बीचे सुद्धा पीक येणार नाही, त्यामुळे वर्षभर संसाराचा गाढा कसा हाकायचा, या विवंचेत निश्चित शेतकरी पडले आहेत. त्यामुळे सरकारने येत्या काळात शेतकऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बळीराजाला मदत करावी, अशी मागणी होत आहे.