वाशिम: पुढारी वृत्तसेवा : राज्य विधीमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशन दरम्यान पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष आणि महिला दिनानिमित्त बोलत असताना विधान परिषद सदस्य भावना गवळी - पाटील (Bhavana Gawli) यांनी महिलांच्या वाट्याला येणार्या संघर्ष, तसेच महिलांच्या कणखरतेबाबत विविध मुद्दे मांडुन रडायचं नाही, लढायचं असे आवाहन महिलांना केले.
यावेळी आ. भावना गवळी पाटील यांनी महिलांसाठी होणार्या विविध कायद्यासाठी, विविध योजनेसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी करण्यात येणार्या विविध कायदे तसेच योजनांच्या सुमारे २५ वर्षापासून २००५ च्या घरगुती हिंसाचार संबंधी कायदा असो अथवा मागील वर्षींचे नारी शक्ती संशोधन विधेयक, अशा विविध कायद्यासाठी त्यांनी लोकसभेमध्ये घेतलेला सहभागाबाबत देखील उल्लेख केला. याशिवाय सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली लाडकी बहीण योजना असेल, मुलीना मोफत शिक्षण, बस प्रवासात ५० टक्के सूट, नावामध्ये आईच्या नावाचा उल्लेख करून मातृ शक्तीला दिलेला सन्मान असेल, यातून सध्याचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नरत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
याशिवाय महिलांना कमजोर न समजता त्यांना पुरेशी संधी मिळाली. तर नियोजनबद्ध आणि योजनात्मक कार्य करून महिला कोणतेही काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकते. महिलाना कमजोर समजू नये, हे सांगताना त्यांनी नारी आहे, शक्ती भारी, तिला का समजता बिचारी, असे प्रतिपादन केले.
आगामी काळात देखील लाडक्या बहिणींना बचत गट मार्फत विविध व्यवसायाच्या संधी देऊन महिला आर्थिक आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने आगामी काळात सरकारने ठोस पाऊले उचलण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.