वर्धा: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वर्ध्यात काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर इच्छूक उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. मुलाखत आटोपली आता उमेदवारीबाबत उत्सूकता लागली आहे.
वर्धा जिल्ह्यातून २६ इच्छूक उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याबाबत अर्ज सादर केलेत. या उमेदवारांच्या मुलाखती पक्षाच्या वतीने घेण्यात आल्यात. सद्भावना भवनात काँग्रेसचे वर्धा जिल्हा विधानसभा निवडणूक निरीक्षक तथा आमदार नितीन राऊत यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांची उपस्थिती होती.
जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर करणार्यांसोबतच मुंबईत अर्ज सादर करणार्यांचा मुलाखतीमध्ये सहभाग होता. मुलाखतीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांमध्ये उत्सूकता दिसून येत होती. यावेळी अनेक उमेदवारांचे समर्थकदेखील सोबत आले होते. उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान त्यांची भूमिका मांडली. या आढाव्याचे इतिवृत्त प्रदेश कार्यालयाला सादर करण्यात येईल, असे वर्धा जिल्हा विधानसभा निवडणूक निरीक्षक आमदार नितीन राऊत यांनी सांगितले.
देवळीकरिता आमदार रणजित कांबळे, चारूलता टोकस यांनी अर्ज केले होते. आमदार रणजित कांबळे मुलाखतीला उपस्थित होते. वर्धा विधानसभेकरिता सुधीर पांगुळ, राजेंद्र शर्मा, डॉ. सचिन पावडे, शैलेश अग्रवाल, प्रवीण हिवरे, पुरुषोत्तम टोणपे, हेमलता मेघे, सुजाता सबाने झाडे, डॉ. अभ्यूदय मेघे, शेखर शेंडे यांनी मुलाखत दिली. आर्वीकरिता शैलेश अग्रवाल, अनंत मोहोड, चंद्रशेखर जोरे, शैलेश निंबोळकर, स्वप्नील उर्फ बाळा जगताप, सोमराज तेलखेडे, प्रिया शिंदे, अरवींद लोहवे, हिंगणघाटकरिता अर्चना भोमले, पंढरी कापसे, प्रवीण उपासे, धर्मपाल ताकसांडे, विजया धोटे यांनी मुलाखती दिली.