वर्धा : खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि.२८) वर्धा वनपरिक्षेत्रातील पुलगाव शिवार परिसरात करण्यात आली. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, मुंबई, अमरावती तसेच वर्धा वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
वर्धा वनपरिक्षेत्रातील पुलगाव शिवारात खवल्या मांजरची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, मुंबई, अमरावती आणि वनपरिक्षेत्र, वर्धा यांनी पथक तयार करून सापळा रचून खवल्यामांजरासह सहा जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडील वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक हरवीर सिंग, सहायक वनसंरक्षक (तेंदू व वन्यजीव) अमरजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश खेडकर, क्षेत्र सहायक जी. एस. कावळे, यु.व्ही. शिरपूरकर, जी. जी. जाधव, एम. एस. माने, गिरीष गायकवाड यांनी केली.