वर्धा : पुलगाव-आर्वी मार्गावरील विरूळजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि. ९) दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव-आर्वी मार्गाने जाणाऱ्या एमएच ४० बीयू २२७४ आणि एमएच ३२ एव्ही ८४५५ या क्रमांकाच्या दोन दुचाकींची समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली समोरासमोर प्रचंड वेगाने धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही दुचाकींवर स्वार असलेले तीनही जण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये सालफळ येथील रहिवासी योगेश रामकृष्ण मेश्राम, तसेच दरने (टाकळी) येथील रहिवासी असलेले देवेंद्र त्र्यंबक दरने आणि गंगाधर पंढरीनाथ दरने या तिघांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केला आणि तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. पुलगाव पोलीस या अपघात प्रकरणाचा पुढील तपास अधिक गतीने करत आहेत.