वर्धाः शहरालगतच्या ग्रामपंचायती लोकसंख्येने मोठ्या आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून त्याबाबतचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. गरजेनुसार नव्याने नियोजन करुन प्राधान्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधून पाणी पुरवठ्याचे ऑडिट करून पाणी पुरवठा नियमित करण्याचे निर्देश राज्याचे गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण, खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
पंचायत समिती वर्धा येथे आयोजित संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत ज्ञानदा फणसे, तहसीलदार संदीप पुंडेकर, गटविकास अधिकारी प्रफुल लोखंडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
नागरिकांना पिण्याचे पाणी प्राधान्याने उपलब्ध व्हावे, यासाठी मागील काळात सतत पाठपुरावा करून नवीन पाण्याच्या टाक्या सुरू केल्या आहेत, असे सांगून राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले, बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन मध्ये किरकोळ दुरूस्त्या असतील तर तात्काळ दुरूस्त करुन घ्याव्यात. मागणीनुसार हँडपंप, विहीर, नवीन पाईप लाईन आदींचे प्रस्ताव सादर करावे, असे ना. भोयर म्हणाले.
जुन्या विहरीतील गाळ काढणे, पाईप लाईनचे जॉईंट, अनेकच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या लिकेज, पाईपलाईन टाकताना होणारे गड्डे आदी दुरस्त्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी गावनिहाय आढावा घेतला. तेथील पाणी पुरवठ्याविषयीच्या तक्रारी जाणून घेतल्या व तक्रारींचे निवारण तात्काळ करण्याच्या सूचना जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिल्या.
प्रत्येक ग्रामपंचायतीला नळ पाईपलाईनचे नकाशे उपलब्ध करुन द्यावे. त्यामुळे खोदकाम करताना पाईप लिकेज होणार नाही. प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. पिण्याच्या व वापराच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशाही सूचना यावेळी ना. भोयर यांनी दिल्यात.