वर्धा येथील सेवाग्राम आश्रम  
वर्धा

Mahtma Gandhi | सत्य, अहिंसा, स्वावलंबनः गांधी विचारांचा जागर आजही वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात !

शिबिर, कार्यक्रमांच्या माध्यमातून गांधीजींच्या विचारांचा प्रसार 

पुढारी वृत्तसेवा

वर्धा : महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वावलंबन, ग्रामस्वराज्य आणि जीवनाचे विचार आजही समाजाला दिशा देणारे ठरत आहेत. युवकांमध्येदेखील गांधी विचारांबाबत जागृती निर्माण होत आहे. देशभरातून मोठ्या संख्येने तरुण गांधी विचारांवर आधारित उपक्रमात सहभागी होताना दिसत आहेत.

सेवाग्राम आश्रमच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्यात येतो. यास युवकांचा प्रतिसादही मोठा मिळत असल्याचे सांगण्यात येते. मोठ्या संख्येने युवक सेवाग्राम आश्रम येथे दरवर्षी भेट देत येथील माहिती जाणून घेतात. 

वर्ध्याच्या सेवाग्राम येथे १९३६ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी आश्रमाची स्थापना केली. या आश्रमात गांधीजींचे वास्तव्य राहिले. आश्रम परिसरात बा कुटी, बापू कुटी, बापुंचे दफ्तर, आदी निवास आदी आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत सेवाग्राम आश्रम महत्त्वाचे राहिले. सेवाग्राम येथे आजही गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू आहेत. गांधीजींच्या वापरातील वस्तू सुस्थितीत ठेवण्यात आल्या आहेत. आश्रमात गांधीजींच्या विचारांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येते. आश्रमात दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. सेवाग्राम आश्रमाची माहिती जाणून घेतात. गांधीजींच्या वास्तव्याबाबत, दिनचर्येबाबत, वस्तुंबाबत माहिती जाणून घेतात. आश्रमात पर्यटकांमध्ये युवक वर्गदेखील मोठ्या संख्येने असतो. देशाच्या विविध भागासोबतच विदेशातूनही अनेक जण येथे भेट देतात. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने गांधीजींच्या विचारांवर आधारित विविध प्रशिक्षण शिबिरे, अभ्यास वर्ग, कार्यशाळा आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांना युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. गांधीजींच्या विचारांवर आधारित उपक्रमांमुळे तरुण पिढीला समाजसेवेसाठी प्रेरणा मिळत आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम हे गांधीजींच्या विचारांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते. देशातील विविध राज्यांतील युवक तसेच अभ्यासक, विद्यार्थी, संशोधक येथे भेट देऊन गांधीजींच्या जीवनकार्याचा अभ्यास करतात. विदेशातूनही अनेक पर्यटक, अभ्यासक आणि स्वयंसेवक सेवाग्राम आश्रमाला भेट देत असून, गांधीजींच्या विचारांवर आधारित जीवनपद्धती जाणून घेतात. गांधीजींचा सेवाग्राम आश्रम आजही समाजासाठी प्रेरणादायी केंद्र म्हणून कार्यरत आहे. गांधीजींच्या विचारांची आजच्या बदलत्या काळातही गरज असल्याचे युवकांमधील वाढता सहभाग स्पष्टपणे दर्शवत आहे.

सेवाग्राम आश्रमाला अनेक पर्यटक भेट देतात. त्यामध्ये युवकांचीही संख्या मोठी असते. आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्येही युवकांचा मोठा सहभाग मिळतो. गांधीजींचे विचार समजून घेण्यासाठी युवक उत्सूक दिसतात, असे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT