वर्धा : विदर्भातील केळी उत्पादक शेतकर्यांना जळगाव, बुरहानपूर व इतर बाजारपेठांच्या तुलनेत मिळणार्या अत्यल्प दरांबाबत तसेच केळी पिकाचा संपूर्ण वर्धा जिल्ह्यात पीक विमा योजनेत समावेश करण्याच्या मागणीसंदर्भात वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शेतकर्यांनी विदर्भातील केळी उत्पादकांवर होत असलेल्या आर्थिक अन्यायाची वस्तुस्थिती जिल्हाधिकार्यांसमोर मांडली.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की, जळगाव व बुरहानपूर परिसरातील बाजारपेठांमध्ये केळीला मिळणारे दर आणि विदर्भातील बाजार समित्यांमध्ये मिळणारे दर यामध्ये मोठी तफावत असून त्यामुळे विदर्भातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मे २०२६ मधील अभूतपूर्व उष्णतेमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यातच दरातील विषमता शेतकर्यांसाठी गंभीर संकट निर्माण करीत आहे. शिष्टमंडळाने शासनाकडे केळीच्या दरातील तफावतीची उच्चस्तरीय चौकशी, न्याय्य बाजारभावाची हमी, व्यापारी कार्टेलची चौकशी तसेच संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील केळी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करण्याची प्रमुख मागणी केली.
यावेळी वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाचे संयोजक डॉ. सचिन पावडे, मनोज नागपुरे, ज्ञानेश्वर मानकर, श्रीकांत देहारे, तुषार भोयर, प्रकाशसिंह बैस, घनश्याम माहुरे, श्याम माहुरे, त्र्यंबक माहुरे, जीवन माहुरे, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन गरपाळ, श्याम भेंडे, कुणाल बैस, मेघराज ढाले, नितीन मानकर, मंगेश खेरे, अनिरुध्द पांडे, रामराव पारीसे, डॉ.निखिल ताल्हन, नरेश बकाने, मनोहर चवरे, विनोद साळवे आदींची उपस्थिती होती.