वर्धा : केंद्र व राज्य शासनाचे महिलांना सक्षम करण्याचे धोरण आहे. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून या दिशेने शासन वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील स्वयंसहायता असलेल्या सर्व १ लाख ५३ हजार ७१ महिलांना लखपती करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मागील वर्षात ७९ हजार ३५७ महिला लखपती झाल्या आहे आणि या वर्षात ६३ हजार ५१२ महिला लखपती झाल्या असून उर्वरीत १० हजार २०२ महिलांना लखपती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १८ वर्षावरील ३ लाख ७७ हजार ८६८ महिलांपैकी २ लाख १९ हजार ८४२ महिला स्वयं सहायता समूहाशी जुळल्या असून आपल्या प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्ननोती अभियान अंतर्गत महिला स्वयं सहायता समुहांना ३० हजार प्रमाणे फिरता निधी आणि प्रभाग संघांना ६० हजार प्रमाणे समुदाय गुंतवणूक निधी देण्यात येतो. यामध्ये जिल्ह्यातील १४ हजार ३७८ समुहापैकी १४ हजार १०० समुहांना फिरता निधी देण्यात आला आहे. तसेच १ हजार ६० समुहांना गुंतवणूक निधी देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या चळवळीला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्ननोती अभियान अंतर्गत चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील महिला सक्षम होण्यास मदत होत आहे.
बचतगटांना स्वत:चा उद्योग निर्माण सुरु करण्यासाठी स्वयंसहायता समुहांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मागील वर्षात ११ हजार ६९६ समुहांना ४८२ कोटींचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असून उद्दिष्टापेक्षा दीडपट जास्त कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या वर्षात ८ हजार ८० समुहांना २२० कोटी रुपयाचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६ हजार ९०२ समुहांना २९७ कोटी ७२ लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.वैयक्तिक उद्योग व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या १ हजार ६०० उद्दिष्टापैकी १ हजार ४५५ विविध योजनेंतर्गत बँकेकडे सादर करण्यात आले असून त्यापैकी बँकेने ९७८ प्रस्ताव मंजूर केले असून उर्वरीत प्रस्ताव लवकरच मंजूर होणार आहे.