वर्धा : विदर्भातील उष्णतेची वाढती तीव्रता लक्षात घेता, वर्धा जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान खात्याने १६ एप्रिल रोजी जिल्ह्यात तीव्र उष्णलहरीचा (Heat Wave) इशारा दिला असून, तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवारी, १६ एप्रिल रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
मागील दोन दिवसांपासून वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. १५ एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला होता. मात्र, १६ एप्रिल रोजी उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याने, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडणे त्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. ही संभाव्य आपत्कालीन स्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने सुट्टीचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने केवळ शाळांना सुट्टी जाहीर केली नाही, तर नागरिकांनाही दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका संभवतो, त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.