वर्धा : टीईटी सक्तीविरोधात प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने दंडवत आंदोलन करण्यात आले. प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांच्या नेतृत्वात व प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असे दंडवत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ व २९ मे २०२६ च्या निर्णयानुसार देशातील कार्यरत जवळपास २० लाख शिक्षकांनी टीईटी परीक्षा ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उत्तीर्ण होऊन ते पात्र न ठरल्यास त्यांना कोणतीही पदोन्नती मिळणार नसून १ सप्टेंबर २०२८ नंतर त्यांना सेवामुक्त करण्याबाबत आदेश दिलेले आहे. हे आदेश देशातील जवळपास २५ लाख शिक्षकांच्या जीवनाशी खेळ करणारे, त्यांचे कुटुंब उध्वस्त करणारे व शिक्षण व्यवस्था कोलमडून टाकणारे असल्याने ते न्यायसंगत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
देशात यापूर्वी कधीही कोणत्याही कर्मचारी, अधिकारी यांची विधिवत नियुक्ती झाल्यानंतर सुमारे २०-२५ वर्षाची अखंड सेवा पूर्ण केल्यानंतर सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी मध्येच कोणतीही अन्य परीक्षा अनिवार्य केलेली नाही किंवा सक्ती केली नाही. २०-२५ वर्षाच्या अनुभवाला बगल देत फक्त २ तासाची टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नाही म्हणून त्यांना सेवामुक्त करणे हे न्याय संगत नसल्याने देशातील कोणत्याही शिक्षकावर टीईटी अभावी अन्यायकारक कृती होणार नाही यासाठी योग्य त्या पर्यायांचा अवलंब करून लाखो शिक्षकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रपती यांना साकडे घालण्यासाठी हे दंडवत आंदोलन करण्यात येत असल्याचे अजय भोयर यांनी सांगितले.
यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पुंडलिक नाकतोडे, मुकेश इंगोले, नरेंद्र थुटे, प्रीती शर्मा, धनराज कावटे, इम्रानुल्ला खान, प्रवीण घोडखांडे, राजीव धात्रक, उमेश खंडार, रहीम शहा, दत्तात्रय राऊळकर, संजय बारी, विलास बरडे, रत्नाकर निखारे, रवींद्र उईके, धीरज समर्थ, अजय बोबडे, सुधीर सगणे, उर्मिला चौधरी, रत्नमाला कन्नाके, दिपाली राडे, अजय काकडे, अजय मोरे, अतुल उडदे, प्रवीण पाटभाजे, प्रशांत निंभोरकर, मनीष ठाकरे, कल्पना उईके, स्मिता गेडे, वैशाली चिकटे, विनीत आहाके, अरुण राऊत, कुलदीप पवार, पवन बानोकर, निखिल वाघमारे, रामेश्वर सुरकार, विजय पाली, ताराचंद भुसे, सौरभ वाघ, अर्पित वाघ, अभिजीत जांभुळकर, प्रदीप भट, अजय कोल्हे, मेहत्रे यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.