वर्धा : पुढारी वृत्तसेवा
एकाने बायको उभी केली दुसऱ्याने बाबू उभा केला, पुढच्या विधानसभेत मुलगा उभा केला जाईल अशी परखड टीका बच्चू कडू यांनी आर्वी विधानसभेत महायुती व महाविकास आघाडीकडून आर्वी येथील रिंगणात असलेल्या उमेदवारांवर केली आहे. देवेंद्र फडणवीसांचा लिहिणारा बाबू इथं आमदार व्हायला लागतो, महाराष्ट्रात पन्नासेक अधिकाऱ्यांनी उमेदवारी घेतलीय, अशी टीका करीत बच्चू कडू यांनी प्रहार केलाय.
आर्वी विधानसभा क्षेत्रातील आष्टी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार जयकुमार बेलखडे यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांची सभा पार पडली. यावेळी त्यानी टीका केली आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात खासदार अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पत्नी मयुरा काळे यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय, तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे पी ए सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे बच्चू कडू यांनी घराणेशाही व नोकरशाहीवर टीका करीत युती-आघाडीचा समाचार घेतला.
पक्ष मोठा नाही तर कार्यकर्ता हा पक्षाला मोठा करतो, अनेक गोष्टी धर्म आणि जातीच्या नावावर पेटविल्या जात आहेत. हे धर्म आणि जातीशिवाय निवडून येत नाहीत. पन्नास वर्षे काँग्रेस तर पंधरा वर्षे भाजप सत्तेत राहिली, महाराष्ट्रात काय बदल झाला. आजही तलाठी छाती ठोक आमच्यासमोर उभा असतो. प्रजेचं राज्य नाही तर कर्मचारी, अधिकारी आणि नेत्यांचं राज्य आहे. आमचं राज्य संपलं आता प्रजेचं राज्य निर्माण करावं लागतं असे ते म्हणाले.