वर्धा; पुढारी वृत्तसेवा : कृषी विभागाकडून केंद्रांमध्ये बियाण्यांचे सॅम्पल घेतल्यानंतर पैसे दिले जात नसल्याने कृषी केंद्र व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बियाण्यांच्या सॅम्पलचे सुमारे ७० ते ८० लाख रुपये थकीत असल्याचे कृषी व्यावसायी संघाचे म्हणणे आहे. राज्यभरात ही रक्कम कोट्यवधीच्या घरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात कृषी केंद्रांच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या बियाण्यांच्या तपासणीकरिता कृषी केंद्रांमध्ये जावून कृषी विभागाचे अधिकारी सॅम्पल संकलित करतात. प्रत्येक हंगामातच कृषी विभागाकडून सॅम्पल घेण्यात येतात. सॅम्पलसंदर्भात देयक दिले जात असून त्याची रक्कम मिळणे आवश्यक ठरते. ही रक्कम २०१९ पूर्वी मिळत होती. पण, २०१९ पासून कृषी केंद्र धारकांना अद्यापही ही रक्कम देण्यात अलेली नाही. सॅम्पल कृषी विभागाच्या अधिकार्यांनी घेतले असून त्याची रक्कम मात्र अद्यापही दिलेली नसल्याचे दिसून येते. २०१९ पासून सॅम्पलचे पैसे थकल्याने कृषी केंद्रधारकांची अडचण होत आहे.
बियाण्यांच्या सॅम्पलचे सरकारकडे कृषी केंद्रांचे ७० ते ८० लाख रुपये थकीत आहेत. २०१९ पासून सॅम्पलचे पैसे थकले आहेत. त्यापूर्वी ही रक्कम देण्यात होती. बियाण्यांच्या सॅम्पलची रक्कम द्यावी, अशी मागणी जिल्हा कृषी व्यावसायी संघानं केली आहे.
रवी शेंडे, अध्यक्ष – वर्धा जिल्हा कृषी व्यावसायी संघ