चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दैनंदिन जिवनात छोट्या छोट्या वस्तुंचा वापर केला जातो. परंतु त्या वस्तुंना लागून येणाऱ्या प्लॅस्टीक आवरण (रॅपर) ला कुठेही फेकून दिले जाते. या छोट्या वस्तु पर्यावरणाला घातक ठरत आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारने प्लॅस्टीक व्यवस्थापनाकरीता मोठे पाऊल उचलले आहे. स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 मधून गावस्तरावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घूग्घस जवळील नकोडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी 'प्लॅस्टीकला बाटली बंद' करून पर्यावरण रक्षणाचा विडा तर उचललाच आहे, मात्र सरकारच्या प्लॅस्टीक व्यवस्थापनाला बळ देण्याचे काम केल्याने हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. (Plastic Waste)
प्लॅस्टीक कचरा सध्या सरकारची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच केंद्रसरकार राज्य सरकारांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 राबवित आहे. या कार्यक्रमातून घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यातीलच एक घटक प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा (घुग्घूस) येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या 'प्लॅस्टीक व्यवस्थापनाला बळ' देण्याचे काम केले आहे. (Plastic Waste)
चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत नकोडा (घुग्गुस) येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (मराठी शाळा) आहे. या शाळेत 7 वर्ग आहेत. 110 विद्यार्थी आहेत आणि पाच शिक्षक कार्यरत आहे. येथील सहाय्यक शिक्षीका श्रध्दा भूसारी यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. 12 जुलै ला नुकताच जागतिक कागदी पिशवी दिवस पार पडला. (Plastic Waste)
रायगडमध्ये पाहिलेल्या प्लॉस्टीक व्यव्यस्थापनाची पद्धत भुसारी यांनी आपल्या घरातूनच सुरू केली. याकरीता त्यांनी घरातील सर्व प्लॅस्टीक कचरा एका बॉटलमध्ये भरला आणि ती बॉटल शाळेत घेऊन गेल्या. त्यांनी ही व्यवस्थापनाची पध्दत मुलांना आणि शिक्षकांना सांगितली. ती पध्दत सर्वांना आवडली. त्यामुळे प्लॉस्टीक व्यवस्थापनाची ही पध्दत शाळेत अंमलात आणण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ही पध्दत आपल्या घरी सुरू केली. या करीता ठिकठिकाणी फेकून देण्यात येणाऱ्या खाली प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करण्यात येतो. त्यामध्ये प्लास्टिक पिशवी, चॉकलेट-बिस्कीट पॉकेट व दैनंदिन जिवनात वापरात येणाऱ्या विविध वस्तुंना लागून येणारे आवरण (रॅपर), शाळेतील असो वा घरगुतीस्तरावर प्लॅस्टीकचा तयार होणारा कचरा दिसला की विद्यार्थी बॉटलीत बंद करतात. त्यामुळे सार्वजनिक स्थळी, गावात प्लॅस्टीक व्यवस्थापनाला छोट्याशा संकल्पनेतून सुरूवात झाली आहे.
लवकरच गावातील किराणा दुकान, हॉटेल, पानठेले आदी मध्ये ही व्यवस्थापनाची संकल्पना राबविण्याचा मानस सहाय्यक शिक्षिका श्रध्दा भूसारी यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला. ज्ञानार्जनातून प्लॉस्टीक व्यवस्थापन करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून एका बॉटली मागे पाच रूपये सहाय्यक शिक्षिका भूसारी ह्या स्वत:कडील देतात. चिमुकले त्या पाच रूपयातून आवडीच्या वस्तू घेतात. स्वत:च्या घरून सुरू झालेला उपक्रम शाळेत पोहचला. आता शाळेतून हा उपक्रम घरात पोहचला आहे. याला गावात पोहचवून स्वच्छतेची लोकचळवळ करण्याचा मानस सहाय्यक शिक्षीका श्रध्दा भूसारी यांनी व्यक्त केला आहे.
छोट्याशा गावातील मराठी शाळेतून सुरू करण्यात आलेल्या प्लॉस्टीक व्यवस्थापनाच्या उपक्रमाने गाव प्लॅस्टीकमुक्त तर होणारच आहे परंतु पर्यावरणाचे रक्षण सुध्दा होणार आहे. मराठी शाळेतील हा छोटासा उपक्रम केंद्र सरकारच्या प्लॅस्टीक व्यवस्थापनाला बळ देणारा ठरल्याने या उपक्रमाची चर्चा पचंक्रोशीत होत आहे. आधुनिक आणि बदल्या भारताला प्लॅस्टीक व्यवस्थापन तेवढेच महत्वाचे असून नकोडा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी सुरू केलेला स्वच्छतेचा अनोखा उपक्रम अनुकरणीय आणि भविष्यात मैलाचे ठरणार आहे.
कचऱ्याचे स्त्रोत हे घर, सार्वजनिक स्थळे आहेत. उपयोगातील वस्तु पासूनच विविध प्रकारचा कचरा निर्माण होतो. उपयोगात येणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन होते. अन्य कचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही.तो कचरा सार्वजनिक स्थळी पडतो. पर्यायाने पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. मानवी जिवनावर त्याचा परिणाम दिसतो. त्यामुळे स्वत:पासून, घरातून गावातून प्लॅस्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन होणे प्रत्येक गावाकरीता आणि गावातील प्रत्येकारीता गरजेचे आहे. बालमनावर चांगले संस्कार झाले तर त्याचे परिणत दिसून येतात. त्यामुळेच मी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाचे धडे गिरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सहाय्यक शिक्षिक श्रध्दा भूसारी यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा