नागपूर : पुढारी वृत्तसेवा
लग्नामध्ये सुरू असलेला दोन गटातील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. संशयित आरोपींनी सपासप चाकूचे घाव घालून त्याची केली हत्या. ही घटना यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.
श्री शिवछत्रपती मंगल कार्यालय येथे एका लग्नसमारंभासाठी हा तरुण गेला होता. विहंग मनीष रंगारी (वय 24 वर्ष) राहणार टेका नाका, मानवता नगर असे या मृत तरुणाचे नाव आहे. लग्नात दोन गटात सुरू असलेला वाद सोडविण्याचा प्रयत्न त्याच्या जीवावर उठला. संशयित आरोपी बिरजू दीपक वाढवे (वय 30 वर्षे) व त्याच्या सहकाऱ्यांनी भांडणातून मध्ये का पडला, म्हणून या तरूणावर चाकूने घाव घातल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
संशयित आरोपी बिरजू वाढवे व सहकारी चार्ल्स कॉलनी जरीपटका येथील रहिवासी असून बिरजू कुख्यात गुन्हेगार आहे. या घटनेने रंगारी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. यशोधरा नगर पोलीस फरार संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.