नागपूर

हिवाळी अधिवेशन : विधीमंडळावर धडकले सहा मोर्चे, संगणक परिचालकांचे आंदोलन 

backup backup
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उपराजधानीतील हिवाळी अधिवेशन संपण्याच्या मार्गावर असताना आपल्या मागण्या सरकारकडून पदरी पाडून घेण्यासाठी आंदोलकांची लगबग वाढली आहे. मंगळवारी (दि. १९) ६ संघटनांनी आपल्या मागण्यासाठी विधीमंडळावर धडक दिली. यामध्ये कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंच, नाथजोगी नागपंथी भराडी समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडियन युथ काँग्रेस या संघटनांचा समावेश होता. सातत्याने आक्रमक असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेने आंदोलन करीत आपल्या मागण्याकडे आज पुन्हा सरकारचे लक्ष वेधले.
गेल्या सहा दिवसापासून ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे आंदोलन सुरु असताना सरकार फक्त आश्वासन देत होते. आम्हाला आश्वासन नको तर जी आर पाहिजे यावर आज भर दिला.

एस.टी कामगारांना पगारवाढ द्या

संपकाळात जाहिर करण्यात आलेल्या पगार वाढीतील त्रृटी दुरुस्त करुन एस.टी कामगारांना पगारवाढ द्या, २०१६पासून वेतनवाढ व घरभाडे भत्ता, तात्काळ देण्यात यावे,महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतल्यानंतर तो तातडीने देण्यात यावे, एसटी महामंडळाच्या मुख्यालयात व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालना बाहेरील खुल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळयाशेजारी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा बसविण्यात यावा, यासह इतर मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने धर्मपाल ताकसांडे  आणि मधुकर ओरके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

बोगस आदिवासीवर कारवाई  करा

संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आदिवासींना मुलनिवासी म्हणून मान्यता द्या, आदिवासींच्या प्राचीन बोली भाषांना राष्ट्रीय भाषेचा दर्जा द्या, आदिवासींना जनसंख्यानुसार ९टक्के आरक्षण देण्यात यावे, शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या आदिवासींना घरकुल देण्यात यावे. यासह आदी मागण्यासाठी बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंचच्या वतीने सतीश पेंदाम यांच्या नेतृत्वाखाली विधीमंडळावर मोर्चा काढण्यात आला.
नाथजोगी समाजावर होणारे अत्याचार थांबवा ,नाथजोगी, नाथपंथी,भराडी भटक्या जमाती हा समाज शैक्षणिक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या खुप मागासलेला आहे. भीक मागणे हा या समाजाचा व्यवसाय आहे. या समाजावर होणारे अन्याय, अत्याचार सरकाने कडक कायदे करुन थांबवावे, तसेच पिडीत कुटूंबाचे पुनर्वसन करुन २५ लाख रुपये आर्थिक मदत द्या,नाथजोगी समाजाला घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जमीनीचे हक्काचे पट्टे देण्यात यावे, मुलांना  शासकीय वसतीगृहाचा लाभ देण्यात यावे, सुशिक्षित मुलांना महिलांना रोजगार देण्यात यावे या व इतर मागण्यासाठी नारायण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाथजोगी, नागपंथी भराळी संघर्ष समितीने मोर्चा काढला होता.

ग्राम रोजगार सेवकांना दरमहा निश्चित मानधन देण्यात यावे

२ मे २०११चा अर्धवेळ जीआर रद्द करुन पूर्णवेळ करण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांच्या वैयक्तिक  खात्यावर मानधन जमा करावे, ग्रामरोजगार सेवकांना टीएडीए देण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकांना विमा संरक्षण देण्यात यावे,आदी मागण्यासाठी  विलासराव जोगदडे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम सेवक रोजगार सेवक संघटनेने विधीमडळावर मोर्चा काढला. शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांना दिले.
उत्तर नागपूर स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व रिसर्च सेंटरचे १२००कोटी तात्काळ द्यावे, शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी, अंबाझरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तात्काळ निर्माण करावे यासह रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने यशवंत तेलंग यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
बेरोजगारी, महागाई, दिव्यांग,आरटीओ चेक पोस्ट भष्ट्राचार सफाई कामगार, ओला उबेर, वाहन चालक,ऑटो रिक्षा तसेच पोलिस सेवा आदी समस्या संदर्भात युवा काँग्रेसच्या वतीने बंटी शेळके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा  गणेश टेकडी येथे थांबविण्यात आल्यावर शिष्टमंडळाने समस्याचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT