Wadettiwar asks, "Tell me, Devabhau—what kind of justice is this?"
नागपूर : पुढारी वृत्तसेवा सेवा दिनावर टाळ्या आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चिडीचूप! असे एकंदरीत सरकारचे धोरण असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सोडले आहे.
दोन दिवस आधीच तुम्ही महिला आरक्षणासाठी लढण्याचं नाटक करत होते, आणि तुमच्यासमोर त्या स्वतःच्या मागण्या मांडायला आल्या की त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवता, कुठला 'लाडका भाऊ' असा वागतो, सांगा ना देवाभाऊ, हा कुठला न्याय? कर्मचाऱ्यांचा आवाज दाबून विकासाचा दिखावा करता येतो, पण वास्तव लपवता येत नाही. सरकारने लगेच शहाणपणाने निर्णय घेतला नाही, तर हा असंतोष सरकारलाच महागात पडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आज राष्ट्रीय नागरी सेवा दिन... आणि महाराष्ट्रात तब्बल १७ लाख कर्मचारी संपावर आहेत, ही राज्यासाठी लाजिरवाणी परिस्थिती आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्या प्रलंबितच ठेवून सरकारने कर्मचाऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर उतरायला भाग पाडलं. यात मोठ्या संख्येने महिला कर्मचारीही संपावर आहेत, ही तर अधिक गंभीर बाब आहे.
शासकीय कार्यालयं, शाळा-महाविद्यालयं, रुग्णालयं आणि अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत, पण सरकारला याचं काहीच देणंघेणं नाही ही खरी वस्तुस्थिती आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हे निष्क्रीय सरकार फक्त जाहिरातींमध्ये रमलंय. विदर्भात म्हणतात ना, “घर जळतंय आणि मालक बासरी वाजवत बसलाय!” तसंच हे सरकार वागतंय असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.