Vijay Wadettiwar Pudhari
नागपूर

Vijay Wadettiwar: बँकांमध्ये पैसे गुंतवू नका, इंधनाचे दर आणखी वाढणार, लॉकडाऊनसारखी परिस्थिती; वडेट्टीवारांच्या विधानाने खळबळ

Vijay Wadettiwar Statement: वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि आर्थिक स्थितीवर भाष्य करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला

पुढारी वृत्तसेवा

Vijay Wadettiwar Statement: राज्यात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेच्या चर्चांदरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका विधानाने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. नागरिकांनी सध्या मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवणूक करण्यापासून सावध राहावे, असा सल्ला देताना त्यांनी भविष्यात पुन्हा ‘लॉकडाऊनसारखी परिस्थिती’ निर्माण होऊ शकते, असा इशाराही दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि आर्थिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. “असलेले पैसे सुरक्षित ठेवा. सध्या कुठेही फार मोठी गुंतवणूक करू नका. एकदा पैसा अडकला तर तो परत मिळवणे कठीण होऊ शकते,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बँकिंग व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करत, “बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निधीचा वापर ज्या पद्धतीने केला जातो आहे, त्यामुळे भविष्यात मोठे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते,” असा दावा त्यांनी केला आहे.

देशातील वाढत्या महागाईचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. “सामान्य माणूस रोजच्या खर्चाने होरपळतो आहे. महागाई कमी करण्याऐवजी केवळ मोठ्या इव्हेंट्सवर भर दिला जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचालींवरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “जोपर्यंत उमेदवार निश्चित होत नाही, तोपर्यंत अनेक गोष्टी अनिश्चित असतात. उमेदवार अंतिम झाल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल.” भाजपमध्ये उमेदवारांबाबत अजूनही अंतर्गत चर्चा सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

कल्याणमधील बकरी ईदच्या दिवशी घडलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार यांनी देशात धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण होत असल्याची टीका केली. “समाजात तेढ निर्माण करून लोकांच्या भावना भडकवल्या जात आहेत. महत्त्वाच्या प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी वातावरण तापवण्याचे राजकारण सुरू आहे,” असे ते म्हणाले.

वडेट्टीवार यांच्या या विधानांमुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात नव्या आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या आर्थिक इशाऱ्यांमुळे सामान्य नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT