नागपूर : महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून विदर्भवादी येत्या १ मे रोजी काळया फिती लावून जिल्हानिहाय सरकारचा निषेध करणार आहेत. याविषयीची माहिती माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी गुरूवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत दिली.
शेतकरी कर्जबाजारीपणामुळे जीवन संपवित आहेत, हे रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असल्यामुळे यावर वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे. त्या संदर्भात जनजागृतीसाठी येत्या 25 मे रोजी अमरावती येथे पश्चिम विदर्भ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात विदर्भातील शेतकऱ्यांवरील संकट, विदर्भाचे मागासलेपण, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर मंथन केले जाणार आहे. वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भाचा विकास अशक्य आहे, असे मत या आंदोलनाच्या पूर्वतयारी संदर्भात गिरीपेठ येथे आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आले. ज्येष्ठ विदर्भवादी नेते अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले अध्यक्षस्थानी होते.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात येणार असून विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळविणे, हेच आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करून काळ्या फिती लावणार असल्याचे अॅड. वामनराव चटप यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ श्रीनिवास खांदेवाले, रंजनाताई मामर्डे, मुकेश मासुरकर, अरुण भाऊ केदार, पी आर राजपूत, सुनील चोखारे, नरेश निमजे, प्रशांत नखाते आणि गुलाबराव धांडे उपस्थित होते.