नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रविवारी (दि.22) नागपूरात शहीद चौक विदर्भ चंडिका येथून ‘विदर्भ राज्य जनसंकल्प लॉंग मार्च’ काढण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने या मार्चचे आयोजन करण्यात आले. इतवारीतील शहीद चौक येथून सुरू झालेला हा मार्च महाल येथील चिटणीस पार्कपर्यंत काढण्यात आला. समोर बंजारा समाजाच्या आकर्षक वेशभूषेत महिला लक्षवेधी होत्या.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने 121 वर्षांपासून सुरू असलेली लढाई संपविण्याचा, 2027 पूर्वी वेगळा विदर्भ घेण्याचा निर्णय रविवारी मेळाव्यात घेतला. विदर्भभर व गावागावात ही मागणी पोहचविण्याचे दृष्टीने विदर्भ चंडिकेला नमन करून चिटणीस पार्कपर्यंत मोर्चा निघाला. विदर्भ आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार जाहीर केला गेला.
महाराष्ट्रात 68 वर्षांत शेतकरी आत्महत्या, कुपोषणामुळे गर्भारमाता व स्तनदामाता मृत्यू, रोजगाराच्या संधी नसल्यामुळे वाढलेला नक्षलवाद, प्रदूषण व त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार रोखण्यात सरकारला आलेले अपयश, कमी झालेले लोकप्रतिनिधी वाढविण्यात व बेरोजगाराचे स्थलांतर रोकण्यात आलेले अपयश हे जटील प्रश्न विदर्भाचे स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय सुटू शकत नाही. कारण राज्याचे उत्पन्न 5,60, 963 कोटी रु. असून राज्यावर असणारा कर्जाचा डोंगर व व्याजाचा बोझा 9,83,725 कोटी रुपये असून राज्याला ठेकेदारांचा पेमेंटची लायबलिटी 95732/- हजार कोटी आहे. त्यामुळे विदर्भ 100 वर्ष महाराष्ट्रात राहिला तरी त्यांचे प्रश्न कदाचित सुटू शकत नाही. म्हणून " ना दान चाहिए, ना अनुदान चाहिए, हमे तो सिर्फ विदर्भ राज चाहिए "अशा घोषणा दिल्या गेल्या.
ऍड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मेळाव्याचे उदघाटन भाजपचे माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी लिहिलेल्या " महाराष्ट्रात राहण्याचा अनुभव व विदर्भ राज्याची अपरिहार्यता " या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते पार पडले. या मेळाव्याला जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप, ऍड. नीरज खान्देवाले, श्रीमती रंजनाताई मामर्डे, मुकेश मासुरकर, अरुणभाऊ केदार, डॉ. पी. आर. राजपूत, विष्णुपंत आष्टीकर, सुनील चोखारे, ऍड. सुरेशराव वानखेडे, तात्यासाहेब मत्ते, एस. शंकर अण्णा यांनी मार्गदर्शन केले.मेळाव्याचा समारोप विदर्भ राज्याची शपथ घेऊन करण्यात आला.