नागपूर: राजधानीत बुधवारी तृतीयपंथीयांच्या दोन गटांतील संघर्ष उफाळून आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. सात वर्षांपूर्वी गाजलेल्या 'चमचम' हत्याकांडातील मुख्य आरोपी उत्तम बाबा याच्या नेतृत्वावरून हा वाद पेटला असून, "सहकाऱ्याची हत्या करणारा आमचा नेता होऊ शकत नाही," असा आक्रमक पवित्रा घेत शेकडो तृतीयपंथीयांनी आपला संताप व्यक्त केला.
नेमकी घटना काय?
२०१९ मध्ये किन्नर समाजातील प्रभावशाली व्यक्ती असलेल्या चमचमची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला उत्तम बाबा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून सुटून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर काही बनावट तृतीयपंथीयांना सोबत घेऊन उत्तम बाबा एका हॉटेलमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि 'पिठाभिषेक' करणार असल्याची माहिती समोर आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागपुरातील तृतीयपंथीयांचे चार मोठे गट रामदासपेठ परिसरातील हॉटेल तुली इंपिरियलसमोर एकवटले.
तणावपूर्ण स्थिती आणि पोलिसांची धावपळ
हॉटेलबाहेर शेकडो तृतीयपंथीयांची गर्दी जमल्याने आणि घोषणाबाजी सुरू झाल्याने काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. "आमच्या सहकारी चमचमचा जीव घेणाऱ्या आरोपीला सन्मानित करण्याची गरज नाही," अशी भूमिका या गटांनी माध्यमांशी बोलताना मांडली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
नेतृत्वाचा संघर्ष पेटण्याची शक्यता
उत्तम बाबाच्या सक्रिय होण्यामुळे किन्नर समाजातील नेतृत्वाचा वाद आता ऐरणीवर आला आहे. भविष्यात या दोन गटांतील संघर्ष अधिक हिंसक वळण घेऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.