नागपूर - आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. रामरक्षा पठण करणे हे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे काम असले तरी प्रभू श्री रामाचे रक्षण करणे हे आमचे, रामभक्तांचे काम आहे. नीट परीक्षेमुळे मुलांचे जीव गेले, सरकारला परीक्षाही नीट घेता येत नाहीत. आंदोलकांशी चर्चा करता येत नाहीत. यासाठीच हिंदूनी मुले जन्माला घालायची का, राम मंदिरात चोरी झाली,रामभक्तांच्या भावनेवर दरोडा टाकला गेला तरी कुणी बोलत नाही हेच का तुमचे हिंदुत्व ? या शब्दात शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी आज भाजप, संघावर हल्लाबोल केला. शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आज शनिवारी उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे यांचे रामरक्षा पठण आणि महाआरती रामनगर येथील राम मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला रामरक्षा वाचता तरी येते का, असे आवाहन केले. मी ते आव्हान स्वीकारून त्यांच्या गावात आलो. केवळ वर्गातल्या मॉनिटरसारखे वागू नका, घटनांची जबाबदारी स्वीकारा असे आवाहन दिले. मंदिर वही बनायेंगे ...कशासाठी लुटण्यासाठी का, किती मंदिरात चोरी,जमीन घोटाळे झाले. अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळी आज समोर समोर करणारे भाजपनेते कुठे होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली हे आमचे हिंदुत्व आहे.
पत्रकारांनी विचारले ही मशीद शिवसैनिकांनी पाडली तुम्हाला काय वाटते असे विचारले त्यावेळी क्षणात, असे झाले असेल तर मला त्याचा अभिमान, गर्व आहे असे बाळासाहेब बोलले. मी शेजारीच उभा होतो. लोकांनी बलिदान दिले ते यासाठी का, लोक म्हणतात यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये, राम भक्तांच्या भावनांशी खेळ केला जात असताना तुम्ही गप्प का, बाळासाहेबांना आम्ही विसरलो नाही, गद्दारांनी मंदिर चोरी संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असा सवाल एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
भाजपने दगा दिला म्हणून महाआघाडी, एसआयटी थोतांड आहे. उद्या अयोध्येतही महाआरती करणार, निकाल लावायचा तर निवृत्त न्यायाधीश हवेत,अभय ओक यांच्यासारखे, लोक म्हणतात हाच पैसा आमदार खरेदीत वापरला. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक प्रकरणी उद्या मुंबईत सर्वपक्षीय आंदोलनाची माहिती दिली.
बॅनर हटविल्याने तणाव
दुसरीकडे या उपक्रमाच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी आणि विरोधात माजी खासदार नवनीत राणा समर्थकांनी लावलेले, ठाकरे यांना चिमटा काढणारे होर्डिंग्ज उपराजधानीत मनपा प्रशासनामार्फत हटविण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अयोध्येतील राममंदिरात झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिक्सेनेने हे आयोजन केले.
या कार्यक्रमासाठी आम्ही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेससह इतर सर्व पक्षांना निमंत्रण दिले. राम आमचे एकट्याचे किंवा भाजपचे नाहीत. आम्ही रामाचे मालक नाही. राम सर्वांचे आहेत. मात्र, रामाच्या नावाने हजारो कोटी लुटले गेले, ही देशातील समस्त हिंदू, आमच्यासाठी चिंतेची आणि शरमेची बाब असा टोलाही लगावला.
मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे यांच्यासोबत रामरक्षा पठण, महा आरतीच्या कार्यक्रमानंतर मुख्य रस्त्यावर ठरल्यानुसार रिमझिम पावसात ठाकरेंची सभा झाली. यावेळी अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, संजय राऊत,संपर्क प्रमुख सतीश हरडे, महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.