Pawangaon Car Accident Two Youth Dead
नागपूर : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारमधून निघालेल्या तीन अल्पवयीन मित्रांवर काळाने घाला घातला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून जोरदार आदळली. या भीषण अपघातात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावनगाव परिसरात घडली.
या अपघातात भौमिक अमोल लारोकर (वय १६, रा. संचेती कॉलेज परिसर, वर्धा रोड) आणि सागर संजय मेलवाणी (वय १७, रा. पारडी) यांचा मृत्यू झाला. तर कारचालक मिहीर आनंद बेहार (वय १७, रा. सुभाननगर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तारांगण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मिहीर बेहार याच्या वडिलांच्या मालकीची इलेक्ट्रिक टाटा कार (क्रमांक एमएच ४९ सीएस ०४२७) घेऊन मिहीर, भौमिक आणि सागर हे तिघे मित्र बुधवारी पहाटे मित्र जय याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाले होते. मित्र जयला येण्यासाठी काही वेळ लागणार असल्याने हे तिघे कारमधून परिसरात फेरफटका मारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मिहीर हा कार चालवत होता, तर भौमिक आणि सागर हे अनुक्रमे पुढील आणि मागील सीटवर बसले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास पावनगाव ते भरतवाडा वाय-पॉईंटदरम्यान कार भरधाव वेगाने जात असताना अचानक मिहीरचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
याचदरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक सीजी ०४ एमसी २९८१ वर कार पाठीमागून जोरदार आदळली. धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातात कारमधील भौमिक लारोकर आणि सागर मेलवाणी यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मिहीरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कळमना पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मित्राच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.