नागपूर: जिल्ह्यातील कन्हान नगर परिषद हद्दीतील तुकाराम नगर परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात सहा हरणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने वन्यजीवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास हरणांचा एक कळप कन्हान रेल्वे स्थानकाजवळील रूळ ओलांडत होता. त्याच वेळी भरधाव आलेल्या रेल्वेगाडीची या कळपाला जोराची धडक बसली. यात पाच मादी आणि एक नर अशा एकूण सहा हरणांचा जागीच मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते संजय सत्यंकार यांनी या घटनेची माहिती दिली.
वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अपघाताची माहिती मिळताच संबंधित विभागाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या घटनेमुळे परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रेल्वे मार्ग ओलांडताना वन्यजीवांचे बळी जात असल्याने, रेल्वे मार्गालगत संरक्षक जाळ्या किंवा प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. सध्या वन विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.