नागपूर: दिल्लीत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी मतदार यादीतील घोळाबाबत अत्यंत गंभीर आरोप केले, पण त्यावर चर्चा होण्याऐवजी उद्धव ठाकरे कुठे बसले होते यावरच सत्ताधारी भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले गेले. 'मत'चोरीच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नागपूरातून मंडल यात्रेला आजपासून (दि.९) प्रारंभ झाला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्वव ठाकरे मागच्या रांगेत बसण्यावरून भाजप राजकारण करत असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील बसण्याच्या जागेवरून सुरू असलेल्या राजकारणावरही पवारांनी पडदा टाकला. "राहुल गांधी यांचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) सर्वांना व्यवस्थित दिसावे, यासाठी उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसले होते. यात कोणतेही राजकारण नव्हते, पण सत्ताधाऱ्यांनी विनाकारण यावरून वाद निर्माण केला," असे म्हणत त्यांनी या वादात तथ्य नसल्याचे सांगितले. तसेच मी देखील राहुल गाधींच्या पत्रकार परिषदेला मी देखील उपस्थित असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्याच्या उपराजधानीतून आपल्या महत्त्वाकांक्षी 'ओबीसी मंडल यात्रे'चा शुभारंभ केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्याच दिवशी, पवारांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल गांधींच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून केवळ सामाजिक समीकरणेच नव्हे, तर थेट सत्ताधारी आणि निवडणूक प्रक्रियेला लक्ष्य करण्याची पवारांची रणनीती स्पष्ट झाली आहे.
राहुल गाधींनी पत्रकार परिषदेत निवडणुक आयोगावर आक्षेप घेत आरोप केले आहेत, त्यांना निवडणुक आयोगाकडून उत्तराची अपेक्षा आहे, मग भाजपा का टीका करतंय?, असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवत काही धक्कादायक उदाहरणे देखील दिली. यामध्ये "एकाच गावात, एकाच घरात एक व्यक्ती राहत असताना ४० लोकांनी मतदान केल्याचे प्रकार समोर आले आहेत". निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून, त्यांनी या आरोपांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. या प्रकरणात 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालेच पाहिजे. जर राहुल गांधींची माहिती चुकीची असेल, तर आयोगाने तसे स्पष्ट करावे आणि जर ती खरी असेल, तर दोषींवर कारवाई करावी," अशी थेट मागणी पवारांनी यावेळी केली. तसेच या प्रकरणी 'इंडिया' आघाडीचे शिष्टमंडळ लवकरच निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर विचारले असता, "अद्याप यावर बसून चर्चा झालेली नाही," असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. शरद पवार यांनी नागपुरातून ओबीसी मंडल यात्रेच्या माध्यमातून एकीकडे पक्षबांधणीला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.