नागपूर : शरद पवार हे केवळ एका पराभवाने संपणारे नेते नाहीत. 2019 साली आणि गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली शक्ती भाजपला दाखवून दिली आहे असा इशारा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिला. सर्वात मोठा विश्र्वासघातकी, दगाबाज पक्ष भाजप असल्याचा आरोप केला.
गेले काही दिवस शरद पवार, अजित पवार गट एकत्रित येणार, एनडीएशी हात मिळवणी होणार अशा चर्चा सुरू असतानाच देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रविवारी शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे राजकारण दगाबाज, विश्वासघातकी असल्याचा आरोप करीत त्यांचे राजकारण विधानसभा निवडणुकीत जनतेने संपवले. भाजपच्या हाती सत्ता दिली असे विधान केले होते. या संदर्भात सोमवारी आणि देशमुख यांनी पलटवार केला.
2014 साली मोदी लाटेत देखील भाजपला 122 जागा महाराष्ट्रात मिळाल्या. मात्र यावेळी शेतकरी, ग्रामीण जनता, बेरोजगार तरुण सर्व नाराज असताना 149 जागा लढवून भारतीय जनता पार्टीला 132 जागा कशा मिळू शकतात, हे यश ईव्हीएम आणि लाडक्या बहिणीची योजना यामुळे मिळाल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यामुळेच शरद पवार यांचे राजकारण केवळ एका निवडणुकीने कधीही संपणार नाही याकडे लक्ष वेधले.
महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्रितपणे सर्व निवडणुकांना सामोरे गेलो पुढेही जाणार आहोत. दिल्लीत आम्ही स्वतंत्र लढत असल्याने गैरसमज करण्यात अर्थ नाही. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टीने प्रत्येक पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार अधिकाधिक संधी मिळावी म्हणून स्वबळावर लढावे असे वाटते त्या दृष्टीने काही बदल करावे लागतात असेही देशमुख यांनी एका प्रश्नाचे उत्तरात स्पष्ट केले.