Sanjay Raut Invites Fadnavis pudhari
नागपूर

Sanjay Raut | 'हे' काही लग्न नाही ; रामभक्त, कारसेवक म्हणून मुख्यमंत्री, सरसंघचालकांना कार्यक्रमाचे आमंत्रण : संजय राऊत

हिंदुत्वाच्या दृष्टीने जी प्रमुख व्यक्तिमत्त्वे आहेत, त्या सर्वांना आम्ही आदरपूर्वक निमंत्रण दिले आहे

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena UBT Ram Bhakt Invitation Nagpur

नागपूर : हे काही लग्नाचं आमंत्रण नाही ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ हिंदुत्वाचा एक उपक्रम आयोजित करत आहोत. त्यापेक्षा रामभक्त आणि रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवक म्हणून उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनादेखील आमंत्रित केले आहे. आम्ही नागपुरात आलो आहोत, या शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

हिंदुत्वाच्या दृष्टीने जी प्रमुख व्यक्तिमत्त्वे आहेत, त्या सर्वांना आम्ही आदरपूर्वक निमंत्रण दिले आहे. सरसंघचालकांना येणं शक्य नसेल, तर त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवावा, अशीही विनंती केली आहे. याशिवाय भाजपच्या नेत्यांसह इतर पक्षांच्या नेत्यांनाही आम्ही आमंत्रित केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या नागपुरात येणार असून काही लोकांच्या भेटीगाठी घेतील. त्यानंतर ते रामरक्षा पठण कार्यक्रमात उपस्थित राहतील. विदर्भातील विविध भागांतून रामभक्त उद्या उपस्थित राहणार आहेत.

भाजप नेते राजकीय विरोध कसा काय करू शकतात? कुणी काय बोलले, हे मला माहीत नाही. मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे असतात. तुम्ही ज्यांची नावं घेतली, त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे. सलग पंचवीस वर्षे आम्ही भारतीय जनता पक्षासोबत काम केले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे हा मूर्खपणा आहे.

आम्ही नागपुरात हिंदुत्वाचा कार्यक्रम आयोजित करत आहोत. नागपूर ही हिंदुत्वाची राजधानी आहे. सरसंघचालकांबद्दल आमच्या मनात नेहमीच आदर आणि सन्मान राहिला आहे. बाळासाहेब देवरस यांच्याबद्दलही आमच्या मनात आदर आहे. ते परमपूज्य होते. मोहन भागवत यांना निमंत्रण देणं हे आमचं कर्तव्य आहे.

जयंत पाटील – एकनाथ शिंदे भेट नवल नाही

उद्या जर जयंत पाटील रामदास आठवले यांना भेटले, तर ते आठवले यांच्या पक्षात जाणार आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत. नेते एकमेकांच्या भेटी घेत असतात. त्याचा अर्थ पक्षांतर असा होत नाही. ते सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात. त्यांना भेटू द्या काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना पत्र दिले.

परिसीमनावर चर्चा झाली पाहिजे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. देशाच्या एकतेसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांनी यावर सल्लामसलत केली पाहिजे. मला काहीच वाटत नाही. केंद्रात मोठे फेरबदल झाले, तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षातील एखादा वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं आहे की, भारतीय मतांमध्ये घोटाळा झाला आहे आणि मतं चोरली गेली आहेत. ट्रम्प यांनी भारतीय मतांचा अभ्यास केला, तर मोदी काय चीज आहेत, हे त्यांना कळेल.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत मोदींची जबाबदारी

पंतप्रधान मोदी यांना न्यायालयाने निर्देश द्यावेत. यामध्ये त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी राजीनामा घ्यावा. हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानले असते, तर देशाची राजकीय परिस्थिती बदलली असती. गेल्या वीस दिवसांपासून उपोषण सुरू आहे. एक वीस वर्षांची मुलगीदेखील त्या ठिकाणी बसली आहे. तिची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यासंदर्भात गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे अहवाल जात नाही का? सर्वांची संवेदनाच मेलेली आहे. मोदी मंत्रिमंडळात असा एकही मर्द नाही का, जो मोदींसमोर जाऊन सांगेल की, तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे? सोनम वांगचुक यांना वाचवणे हे देशाचं कर्तव्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT