नागपूर : एकीकडे महाराष्ट्र आणि दिल्लीत मोठ्या विजयानंतर भाजपने बिहारमध्येही आमचे आणि मित्रपक्षांचे असेच सरकार येईल, असा दावा केला असताना आता भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'मिशन बंगाल' सुरू झाले आहे. एकीकडे बांगलादेशी घुसखोर विरोधात देशात भाजप आणि संबधित पारिवारिक संघटनांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे. भाजपशासित राज्यात कारवाई जोरात सुरु आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यासह संघाचे शिर्षस्थ नेते, संघटनेतील महत्वाचे पदाधिकारी बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत.
एकंदरीत भाजपचा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयअश्व रोखणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बंगालमध्ये पराभूत करण्याचा निर्धार महाराष्ट्र आणि दिल्ली विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'मिशन बंगाल' निमित्ताने पुढे आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक पदाधिकारी बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत.
१६ फेब्रुवारीपर्यंत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बंगालच्या दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे भागवत यांच्यासह आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि इतर ६ सहसरकार्यवाहदेखील बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या आठवड्यात ११ आणि १२ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्यांची कोलकाता येथे बैठक होणार आहे. दिल्लीत २६ वर्षांनंतर भाजपचा झेंडा फडकला. यामुळे परिवारात आनंद व्यक्त होत आहे. देशभरात सर्वत्र कमळ फुलत असताना बंगालमध्ये मात्र हवे तसे यश मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर सामाजिक समरसता लक्षात घेता संघाच्या शिर्षस्थ पदाधिकाऱ्यांची पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच ही बैठक होत आहे. संघाच्या शताब्दी वर्षात संघटन अधिकाधिक मजबूत करण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
पुढील वर्षी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्यापूर्वीच विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एक वर्ष अगोदरपासून संघ मिशन मोडवर कामाला लागल्याचे पहायला मिळत आहे. अर्थात गेली अनेक वर्षे ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगालमधील एकछत्री अंमल उलथविण्यात भाजप, संघ आणि पारिवारिक संघटनांचे हे मिशन बंगाल कितपत यशस्वी होणार, हे मात्र येणारा काळच सांगणार आहे.