आठवडाभराने दिलासा, दंगलग्रस्त भागातील संचारबंदी उठविली ! File Photo
नागपूर

आठवडाभराने दिलासा, दंगलग्रस्त भागातील संचारबंदी उठविली !

नागपूरकरांसाठी मोठा दिलासा....

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्‍याच्या उपराजधानीत गेल्या आठवडाभर दंगलग्रस्त भागात असलेली संचारबंदी अखेर आज (रविवार) दुपारी तीन वाजता उठविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टप्प्याटप्प्याने संचारबंदी पूर्णतः उठविण्यात येईल असे संकेत दिले होते.

आज रविवारी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी या विषयीचे आदेश जारी केले आहेत. यानुसार नागपुरातील झोन क्रमांक 3 मधील गणेश पेठ, कोतवाली, तहसील आणि झोन क्रमांक 5 मधील यशोधरा नगर या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आली आहे. नागपूरकरांना हा मोठा दिलासा म्हणता येईल.

कशामुळे लागली होती संचारबंदी?

सोमवारी 17 मार्च रोजी हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनादरम्यान औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा, कबर जाळण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर एकंदर 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत खबरदारीचा उपाय म्हणून ही संचारबंदी लावण्यात आली होती. सहा दिवसांनी शनिवारी गणेश पेठ, तहसील आणि कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री सात ते दहा दरम्यान तीन तासांची वाहन चालक तसेच इतरांना सवलत देण्यात आली. मध्यंतरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकीत आढावा घेतल्यानंतर कपिल नगर, नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी उठविण्यात आली, तर सहा पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी दोन ते चार दरम्यान शिथिलता देण्यात आली. मात्र लागलीच शुक्रवारी मिळालेल्या इनपुटनुसार ती मागे घेण्यात आली व संचारबंदी कायम करण्यात आली. यामुळे एकंदर नऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम होती. आजच्या या निर्णयाने दंगलग्रस्त भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT