नागपूर, पुढारी वृत्तसेवा : माझा बीड जिल्हा मुळात चांगला आहे. मी यापूर्वीच सविस्तर बोलली आहे. कुणाची हत्या हे राजकारणाचे हत्यार होऊ शकत नाही, हा कलंक आहे. तो पुसण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मुळात बीड शांत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील त्याचा अनुभव येईल, असा दावा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना केला.
आज आपल्या खात्याशी संबंधित विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर माहूरला श्री रेणुका मातेचे दर्शन घ्यायला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मत्स्य महाविद्यालय येथील कॉलेज मधील अनेक गोष्टी समजून घेतल्या. सहयोगी मंत्री नितेश राणे यांच्याशी ही चर्चा करणार असून जास्तीत जास्त संसाधन वाढवणे, यावर आमचा भर असणार आहे. नव्या इमारतीची आवश्यकता आहे. एकंदरीत हा दौरा उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग कसे वाढवता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहे. महाराष्ट्र पुढे जावा हीच संकल्पना आहे. सबसिडी, कर्ज, मार्केटिंग ट्रेनिंग यावर विचार करतो आहोत. पोल्ट्री, वराह पालन वेगवेगळे विषय आहेत. शेवटी जे माणसांसाठी चॅलेंज आहे, ते पशूंसाठीही आहे. बर्ड फ्ल्यू विषयी जागरूकता करू, माणसांमध्ये पसरू नये, अशी काळजी घेतली जात आहे.
उदय सामंत यांच्याबाबत बोलताना माझ्या राजकारणात मी कोण काय म्हणाले, यावर उत्तर देत नाही, कोण नाराज असेल, त्याचे उत्तर मी स्वतः देत नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात मुंडे यांनी सांगितले.