नागपूर : निवडणुकीत मते घेताना सरकारला लाडकी बहीण योजनेबाबत संभाव्य धोके,त्रुटी माहिती नव्हत्या काय? केवळ मते घेण्यासाठी सर्वांना लाडकी बहीणचे फायदे देऊ असे सांगितले. मग आता पडताळणी करण्याची गरज काय पडली हिटलरशाही करत असतील तर ही जनतेच्या पैशाचीच लूट आहे. सुरवातीपासून पारदर्शीता ठेवायला पाहिजे होती. सरकारने आता 2100 रुपये कधी देणार ते सांगावे ,असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारला विचारला आहे.
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे.सगळ्यांनी आनंदित राहावे असा महाराष्ट्र आहे. मात्र आज महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे. मुंबई सुरक्षित नाही. गावातील सरपंच देखील सुरक्षित नाहीत. दिल्लीत आणि देशात महाराष्ट्रात जंगलराज असल्याची चर्चा आहे.
भाजपने सत्तेसाठी दहशत निर्माण केली आहे. आता बेईमानीने निवडून आलात पण नेहमी हे चालणार नाही. या सरकारमध्ये 65 टक्के भ्रष्ट मंत्री आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवथा राहिली नाही. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पोलीस पोस्टिंगमध्येही पैसे घेतले जातात. गुन्हेगारांना कुठलीही भीती राहिली नाही म्हणून अशा घटना घडतात,असेही पटोले म्हणाले.
संतोष देशमुख प्रकरणी बोलताना पटोले म्हणाले,ते एका गावाचे प्रतिष्ठित सरपंच होते. परभणीमध्ये मृत्यू झाला. या गोष्टींना जाती पातीवर कुणीही नेऊ नये. मात्र,या सरकारने नाहक मराठा-ओबीसी वाद निर्माण केला. मूळ जनतेचे प्रश्न, सामाजिक मुद्दे बाजूला राहिले. शेतकऱ्यांचे मुद्दे बाजूला राहिले आहेत. शेतकरी कोण्या एका जातीचा नसतो. महागाई, बेरोजगारी मुद्दे गंभीर आहेत. सरकारने या मूळ प्रश्नावर विचार करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर संदर्भात विचारले असता तो त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे असे सावध उत्तर दिले.
जलजीवन मिशन ही योजना पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकालापासून सुरू केली होती ती मोदींची योजना नव्हती. आज हा भ्रष्टाचार कोण करत आहे. गावात पाण्याचा सोर्स नाही. अजूनही अनेक गावांत पिण्याचे पाणी नाही.पाईप लाईनच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उलट सुलट वक्तव्याबाबत बोलताना पटोले म्हणाले, भाजपचेच अनेक नेते भाजप सरकार विरोधात बोलताना पाहायला मिळत आहे. लोड शेडिंगचा विषय आम्ही सभागृहात उचलला होता. चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. लोकांचा जीव धोक्यात आहे. सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
डाओसमधून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले याकडे लक्ष वेधले असता, यापूर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे देखील गेले होते. आता हीच नक्कल फडणवीसांनी करू नये. आपल्या राज्याचा नंबर 11 व्या स्थानी गेला आहे. डाओसला जाऊन पैशांची उधळपट्टी करू नये.
राज्यात गुंतवणूक आली पाहिजे असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला. भाजप, आरएसएस वर्ग बाबत बोलताना, आम्हाला आक्षेप नाही. कदाचित अलीकडेच देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून ते प्रशिक्षण देत असतील असा टोलाही लगावला.
बीडचे उदाहरण पुरेसे आहे. हे प्रकरण रेती माफियापासून सुरू झाले. राज्यात रेतीचा प्रश्न गंभीर आहे. डेपो पद्धत फेल झाली आहे. रेतीचा मोठा महसूल सरकारला मिळतो. ओवरलोडचा प्रश्न कायम आहे. गडचिरोलीत, सुरजागढमध्ये मोठ्या प्रमाणात माफियाराज वाढेल अशी भीती व्यक्त केली. माध्यमांनी तिथे जावे, लोकांचे जनजीवन प्रभावीत झाले असल्याचे पटोले यांनी सांगितले.