नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनातर्फे विदर्भ भूदान यज्ञ मंडळाची फेररचना केली जाणार आहे. भूदानातील संपूर्ण जमिनींचे जिओ टॅगिंग करणार असून शर्तभंग झालेल्या जमिनी मंडळाकडे जमा करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. विदर्भ भूदान यज्ञ मंडळाच्या नवीन कार्यकारिणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मंत्रालयात आयोजित बैठकीत भूदान मंडळ, कामकाज व सद्याची स्थिती यावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील भूदान मंडळाच्या जमिनींबाबत आढावा घेण्यात आला. विदर्भात अशी एकूण १७,२८० हेक्टर जमीन असून यापैकी १४,८६० हेक्टर जमिनीचे वाटप झाले आहे. तर २,४३७ हेक्टर जमिनीचे वाटप शिल्लक असल्याची माहिती यावेळी विभागामार्फत देण्यात आली. ज्या जमिनींचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यांचे वाटप तातडीने करण्याची सूचना मंत्री बावनकुळे यांनी केली. (Chandrashekhar Bawankule)
त्याचबरोबर वाटप झालेल्या तसेच वाटप न झालेल्या जमिनींची सद्यस्थिती काय आहे, याबाबतची माहिती घेऊन संपूर्ण जमिनींचे जिओ टॅगिंग करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. वाटप झालेल्या जमिनींमध्ये शर्तभंग झाल्यास अशा जमिनी भूदान यज्ञ मंडळाकडे जमा करण्याची सूचनाही त्यांनी केली. बैठकीला विदर्भ सर्वसेवा संघाचे अध्यक्ष अरविंद रेड्डी, समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे, भय्या गिरी, अमर वाघ, मीथिलेश ढवळे, संदीप सराफ आदी उपस्थित होते.