नागपूर : केंद्रासोबतच आता राज्यात भक्कम बहुमताची सत्ता आल्याने भाजपने आपला मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळविला आहे. आगामी काळात निवडणूका होणा-या माजी मंत्री सुनील केदार गट, काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत तसेच महानगरपालिका, विविध नगरपंचायत, नगर परिषद येथील सत्ता काबीज करण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. नागपूर जि.प.च्या विद्यमान पदाधिकारी, व सदस्यांचा कार्यकाळ येत्या १७ जानेवारीला संपुष्ठात येत आहे. अलीकडेच जिल्हा परिषदेत काँग्रेसने मुदतवाढीचा प्रस्ताव मांडला भाजपने समर्थन केले.आता सत्तापक्ष, महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून, सत्तापक्षातील काहीजण भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला भक्कम बहुमत मिळाले आणि राज्यात पुन्हा सरकार स्थापन झाले. त्यामुळे आता लवकरच प्रशासक राज सुरू असलेल्या राज्यभरातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, मुदत संपुष्ठात येणा-या जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद आदींच्या निवडणूका आगामी दोन चार महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपने सत्ता काबीज करावी यादृष्टीने भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
जि.प.तील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने काही पदाधिका-यांवर विशेष जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये काही मुळचे भाजपच्या तर काही काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. कुठल्याही परिस्थितीत २०२५ मध्ये होणा-या जि.प.निवडणूकांमध्ये जि.प.ची सत्ता काबीज करता यावी, यासाठी त्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून रणनीती आखण्याला सुरूवात केली आहे. काहींकडून आत्तापासूनच मविआतील निवडून येण्याची शक्यता असलेल्या सदस्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.