Nagpur Student Hostel Controversy
नागपूर: आकांक्षा प्रकाश उके या एमबीए प्रथम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अखेर सावित्रीबाई फुले वसतीगृहातून बाहेर काढण्याची नोटीस रद्द झाली आहे. आता तिला वसतीगृहात राहता येणार आहे. समाज कल्याण विभागाने हा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे अलीकडेच आकांक्षा आणि तिच्या मैत्रिणी यांनी नागपूरचा कडक उन्हाळा लक्षात घेता वसतिगृहात कुलर हवा अशी मागणी करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्याने प्रशासनामार्फत कुलरची व्यवस्था देखील करण्यात आली.
समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याची कानउघाडणी झाली. मात्र लागलीच वसतिगृहाचा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलाच कसा, असा सवाल करीत आकांक्षाला वसतीगृह सोडण्याची नोटीस मिळाली. यात वेगळे कारण दिले गेले आहे. बाहेर नोकरी करीत असल्याने वसतिगृह प्रवेशाचे नियम मोडल्याने निवास, भोजन शुल्क असे एकंदर 22, 498 रुपये मागितले गेले.
अखेर बेसा परिसरातील सावित्रीबाई फुले वसतीगृहातील नोटीस आलेल्या आकांक्षा उके या विद्यार्थनीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील यासंदर्भात फोन गेला. वसतीगृह न सोडण्यास तिला सांगण्यात आले. कुलर लावल्यानंतर तिला कुलर नसलेल्या ठिकाणी रूम दिली गेली, अशीही माहिती यानिमित्ताने पुढे आली आहे.