नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी नागपूर दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना राज्यभर राबविण्यात येणाऱ्या सेवा उपक्रमांची माहिती दिली. तसेच विरोधकांच्या आंदोलनांवर टीका करत ही आंदोलने प्रायोजित (स्पॉन्सर) असल्याचा आरोपही केला.
चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्टी ठेवून काम करत आहेत. हे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी धार्मिक अधिष्ठानही महत्त्वाचे असून, त्याच भावनेतून भाजपचे कार्यकर्ते राज्यभर विविध सेवा उपक्रम राबवत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर सेवा उपक्रम नागपुरात महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील प्रत्येक मंडळात सेवा यज्ञ होत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे तसेच विविध सामाजिक आणि जनहितार्थ उपक्रमांच्या माध्यमातून सेवा कार्य केले जात आहे.
विरोधकांच्या आंदोलनांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, ही आंदोलने प्रायोजित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची गती वाढली असताना काहीजण आंदोलनांच्या माध्यमातून राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहेत. नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सात ते आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलवाद मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला असून, नक्षलवादाला पोषक असलेल्या संघटनांना परदेशातून होणारा निधीही थांबविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
आंदोलनामध्ये कोण लवकरच बाहेर येणार दरम्यान, सध्या सुरू असलेल्या या आंदोलनांना परदेशातून निधी कोणाकडून मिळत आहे आणि ती आंदोलने नेमकी कोणी प्रायोजित केली आहेत, याबाबतची माहितीही लवकरच समोर येईल, असा दावाही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केला.