नागपूर -महाल गांधी गेट परिसरातील एका धार्मिक स्थळाची चादर, ध्वज जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणांच्या दोन गटात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांवर जमावाकडून दगडफेक केली जात असल्याने पोलिसांच्या बाजूने देखील जमाव पांगविण्यासाठी अश्रूधूर सोडण्यात येत असल्याची माहिती आहे.
हजारो लोक रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूने दंगलसदृश्य स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज सोमवारी सकाळी विहीप, बजरंग दलाने जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन केले. औरंगजेबाचा पुतळा जाळला, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको ,ती तातडीने काढण्याची मागणी करीत त्याचा निषेध नोंदविला. सायंकाळी घडलेल्या या घटनेने महाल परिसरात कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून शांततेचे आवाहन केले जात आहे.
नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी असून, नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नागपूर हे शांतता व सौहार्दासाठी देशभरात प्रसिद्ध असलेले शहर आहे. या शहरात जात-पंथ-धर्म या विषयावरून वाद किंवा भांडणे होत नाहीत. आज जे काही घडले, त्यासंबंधी प्रशासन कार्यवाही करेलच. नागपूरच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता प्रस्थापित होईल यासाठी स्वतः देखील प्रयत्न करावेत, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.