भोसले काळातील एतिहासिक विहीर २०० वर्षे जुनी विहिर Pudhari Photo
नागपूर

Nagpur Historical Well Restoration | २०० वर्षे जुन्या महाकाय विहिरीचे होतेय पुनर्जीवन!

Nagpur News | भोसले काळातील एतिहासिक विहीर

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - कामठी रोडवरील मोतीबाग रेल्वे कॉलनीतील भोसले काळातील २०० वर्षे जुन्या महाकाय ऐतिहासिक विहिरीच्या स्वच्छतेचे काम अखेर सुरू झाले आहे. गेल्या ३ दिवसांपासून या विहिरीतून गाळ,पाणी काढण्याचे काम सुरू आहे. या स्वच्छता मोहिमेदरम्यान, भोसले काळातील ही ऐतिहासिक विहीर जिवंत आढळली.

पहिल्या दिवशी सुमारे एक मीटर पाणी काढल्यानंतर, रात्रीतून १० ते १२ इंच पाणी आपोआप रिचार्ज झाले. दुसऱ्या दिवशीही सुमारे १ मीटर पाणी बाहेर काढण्यात आले. तिसऱ्या दिवशी महापालिकेकडून दुसरा पंप बसवून पाणी बाहेर काढण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त १० ते १२ फूट पाणी बाहेर काढण्यात आले आहे. महानगरपालिकेने अग्निशमन विभागाच्या पंपांचीही मदत घेतली तर पाण्याचा निचरा जलद होईल. पावसाळ्यापूर्वी ही ऐतिहासिक विहीर स्वच्छ केली जाईल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (SECR) मोतीबाग कॉलनीमध्ये असलेल्या ऐतिहासिक भोसले काळातील विहिरीला पूर्णपणे जिवंत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत असा विश्वास. ज्येष्ठ पत्रकार, माजी झेडआरयुसीसी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण डबली यांनी बोलून दाखविला.

या भागात पाणीटंचाईच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा जलस्रोत आहे. एसईसीआर मंडळ रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) दीपक कुमार गुप्ता आणि अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर हे पाऊल उचलण्यात आले. विहिरीत सुमारे ४५ फूट पाणी आहे. त्याची खोली ७० फूट असू शकेल. महापालिकेने ६ अश्वशक्तीचे दोन पंप बसवले आहेत आणि गेल्या तीन दिवसांपासून पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशी, सीएसआयआर-नीरीचे प्रधान तांत्रिक अधिकारी डॉ. सी. पद्माकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभिक औपचारिकता आणि सुरक्षा प्रोटोकॉल पूर्ण करण्यात आले. दर ९५ सेकंदाला ५०० लिटरपेक्षा जास्त पाणी काढले जात आहे. स्वयंचलित रिचार्जवरून असे दिसून येते की ही विहीर जिवंत आहे आणि ती पाण्याचा शाश्वत स्रोत बनू शकते. रेल्वे वर्क्स विभाग (IOW) व डॉ. डबली या विहीर स्वच्छता मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अनेक वर्षांच्या प्रयत्‍नांना यश

विहिरीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असलेले डॉ. प्रवीण डबली यांनी २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात भोसले काळातील ही ऐतिहासिक विहीर जतन करण्याची विनंती केली होती. रेल्वे बोर्डाचे तत्कालीन कार्यकारी संचालक (पीजी) जितेंद्र सिंह यांना या प्रकरणाची चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

ऐतिहासिक महत्‍व असलेली विहीर

नागपूर शहरात ७० x ७० व्यासाची इतकी मोठी विहीर जी कधीकाळी भोसले वाडी गावाला तसेच ब्रिटिश तबेले, तोफा कारखाना इत्यादींना पाणी पुरवत असत. १९०५ मध्ये नागपूरमध्ये नॅरोगेज रेल्वेची स्थापना झाली. त्यावेळी रेल्वेमध्ये वाफेची इंजिने होती. ज्यामध्ये भरपूर पाणी वापरले गेले. या मोठ्या विहिरी नॅरोगेज रेल्वेच्या पाण्याच्या गरजा देखील पूर्ण करत असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT