नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे नागपूर जिल्ह्याकरिता शनिवारी ऑरेंज अलर्ट दिलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
संततधार होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पेंच, तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण पूर्ण १००% भरलेले असून तोटलाडोह धरणाचे १४ पैकी १० दरवाजे ०.४ मी तर नवेगाव खैरी धरणाचे सर्व १६ दरवाजे ०.३ मी ने उघण्यात आलेले असून त्या मधून ५०० पेक्षा जास्त क्यूमेक्स पाण्यचा विसर्ग पेंच नदीमध्ये सुरू आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणातून देखील नदीमध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. या अनुषंगाने नदी व धरणाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पेंच, कन्हान, कोलार, नांद नदी तर नागपूर शहरातील नाग, पिवळी, व पोहरा नदी शेजारी वसलेल्या गावांना व नागरिकांना अधिक काळजी व दक्षता घेण्याची गरज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी व्यक्त केली आहे.