नागपूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळीच्या अन्नपदार्थांची विक्री वाढल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) दक्षता विभागाने मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांत विभागाने नागपूरसह परिसरात विविध ठिकाणी धाड टाकून तेल, पनीर, खोवा आणि दही यांसारख्या अन्नपदार्थांचा तब्बल ५७ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. तसेच अस्वच्छ व अनारोग्यदायी वातावरणात रसगुल्ला तयार करणाऱ्या दोन कारखान्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष मोहिमेअंतर्गत “सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्नसुरक्षिततेचा” या उपक्रमाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण ३२ नमुने घेऊन सुमारे २८,८३७ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला.
त्यामध्ये खाद्यतेलाचे १८ नमुने, एकूण ३३,२७८ किलो, किंमत ₹४७,६४,१३८, पनीर आणि खोवाचे ३ नमुने, एकूण ५२२ किलो, किंमत ₹१,२६,९८०, दहीचे ३ नमुने, एकूण ६,१८४ किलो, किंमत ₹२,५२,४५६, मिठाईचे २ नमुने, एकूण १,७०६ किलो, किंमत ₹२,७२,९६०, अशा प्रकारे एकूण ₹५७,९८,२१७ रुपयांचा साठा जप्त करून नाशवंत व भेसळीचा संशय असलेले पदार्थ नष्ट करण्यात आले.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, बाजारात संशयास्पद अन्नपदार्थ दिसल्यास तातडीने FDA कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्भेळ आणि सुरक्षित अन्नपदार्थांची विक्री करावी.