नागपूर : हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शोभायात्रेतून १४ वर्षाचा अथर्व दिलीप ननोरे हा मुलगा बेपत्ता झाला होता. अखेर आज कळमेश्वरच्या भरतवाडा येथील एका पुलाच्या फुटपाथवर रक्तबंबाळ अवस्थेत भाजीपाल्याच्या पोत्यात छिन्नविछिन्न व कोंबलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्याचे हात-पाय बांधून त्याला फेकून दिल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. परिसरात आज दुकानेही उत्स्फूर्तपणे बंद होती. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने आरोपीला पकडण्यासाठी पावले उचलली आहे.
२ एप्रिल रोजी शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी अथर्व त्याच्या काही मित्रांसोबत गेला होता. रात्री ११ वाजले तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे ननोरे कुटुंबीयांसह परिसरातील नागरीकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे अथर्वची आई रेवती दिलीप ननोरे (वय ४४, रा. माहोरे पेट्रोलपंपाच्या मागे, गिट्टीखदान) यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यावरून गिट्टीखदानचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप इंगळे यांनी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेची अनेक पथके मुलाचा शोध घेत होती.
अथर्वचे वडिल दिलीप ननोरे यांचा भाजीपाला व आलुकांदे विक्रीचा ठोक व्यवसाय आहे. माहोरे पेट्रोलपंपाच्या बाजुलाच त्यांचे भाजीचे दुकान आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यात अथर्व हा लहान आहे. अथर्व बेपत्ता होवून २४ तास लोटले तरी शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप करून शुक्रवार, ३ एप्रिलला दुपारी परिसरातील जनता रस्त्यावर उतरली. त्यांनी रास्तारोको आंदोलन करून गिट्टीखदान पोलीसठाण्याला घेराव केला. यामुळे
गिट्टीखदानमध्ये तणाव पसरला. तगडा बंदोबस्त, कृती पथक तैनात करण्यात आले. गिट्टीखदान पोलिसांना कळमेश्वर तालुक्यातील भरतवाडाजवळ एका पुलाच्या फुटपाथवर संशयास्पद अवस्थेत रक्ताने माखलेले पोेते पडलेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस ताफा घटनास्थळाकडे रवाना झाला. पोलिसांनी पोते उघडून बघितले असता मुलाच्या खिशातील आयकार्डवरून तो अथर्व ननोरे असल्याची ओळख पटली. मृतदेह शव विच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.