Gopikishan Bajoria
नागपूर : अमरावती विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वी त्याच प्रतिज्ञापत्राच्या आधारे आपण चार वेळा विधान परिषदेवर निवडून आलो असून, विप्लव बाजोरिया हे देखील एकदा आमदार राहिले आहेत. मग तेच प्रतिज्ञापत्र आता अवैध कसे ठरू शकते, असा सवाल त्यांनी केला.
यासंदर्भात विप्लव बाजोरिया यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून, ती निवडणूक याचिका म्हणून स्वीकारावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोपीकिशन बाजोरिया आणि विप्लव बाजोरिया यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी हा संपूर्ण प्रकार जाणूनबुजून घडवून आणल्याचा आरोपही बाजोरिया यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याकडून तक्रार दाखल करून घेण्यासाठी प्रवीण पोटे यांनी पुढाकार घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणामुळे अमरावती विधानपरिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.