नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. वृद्ध पती, पत्नी आणि दोन तरुण मुलांचे हे गूढ मृत्यू असून जीवन संपवल्याचे दिसत असले तरी संपत्तीच्या वादातून हे हत्याकांडही असू शकतात असा कयास लावला जात आहे. पोलीस याबाबतीत सर्व शक्यता पडताळून बघत आहेत. कधीकाळी महापुराने हाहाकार उडालेल्या मोवाडमध्ये आज या घटनेविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.
मृतकांची नावे विजय मधुकर पाचोरी (वय 68), माला विजय पचोरी (55), गणेश विजय पचोरी (38) आणि दीपक विजय पचोरी (36 वर्षे) अशी असून हात बांधून असल्याने आत्महत्या शक्य नाही. यामुळे तिघांची हत्या करून मग गळफास घेत जीवन संपवले असल्याचा देखील हा प्रकार असू शकतो. पोलिसांना देखील तीन हत्या आणि एक जीवन संपवण्याचा प्रकार असल्याचा संशय असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेतील तीन मृतदेह हात पाय बांधलेल्या स्थितीत आढळून आल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.
आज (बुधवार) सकाळी नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यातील मोवाड येथे पचोरी कुटुंबीयांच्या घरात चार मृतदेह आढळून आल्याने तारांबळ उडाली. तीन मृतदेहांचे हात-पाय बांधलेले असून, चौथा मृतदेह हा स्वतः फासावर लटकल्याविषयी पोलिस सूत्रांनी दुजोरा दिला. यामुळे कौटुंबिक किंवा संपत्तीच्या वादात दोन मुलांपैकी एकाने अन्य तिघांचे हातपाय बांधून त्यांना फाशी दिल्यानंतर स्वतः गळफास घेतला असावा की आणखी कुणी या घटनेमागे आहे, या विषयी पोलीस कसून तपास करीत आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होताच त्यांच्याकडून परिसराचा कसून तपास सुरू आहे.