Maharashtra State Education Institutions Federation
नागपूर : सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार राज्यभर सुरू करण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना पाठविण्यात आले आहे.
शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या संदर्भातील प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. प्रशासनाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने संच मान्यतेविरोधातील याचिका फेटाळल्याचा उल्लेख केला जात असला, तरी नागपूर खंडपीठात दाखल याचिका क्रमांक ३१८६/२०२५ मध्ये “जैसे थे” स्थिती कायम ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
ही याचिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दाखल केली असून न्यायालयाचे “जैसे थे” आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू होतात. अशा परिस्थितीत सध्या सुरू असलेली समायोजन प्रक्रिया ही न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात असल्याचा आरोप महामंडळाचे सरकार्यवाह रविंद्र फडणवीस यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, सदर समायोजन प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी आणि कायदेशीर स्थिती स्पष्ट होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.