नागपूर : बारावी परीक्षेतील पेपरफूट प्रकरणानंतर आता राज्य सरकारने यासंदर्भात एसआयटी स्थापन केली आहे. कॉपीमुक्त अभियानावर सरकारचा भर असल्याने सर्व पाळेमुळे खोदून काढली जाणार आहेत.
नागपूरमधील या पेपरफूट प्रकरणात आतापर्यंत चारजण अटक झाली आहे. प्रकरणाची व्याप्ती बघता आता SIT मार्फत तपास करणार असल्याची माहिती गृह, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. शिकवणी वर्ग संचालकासोबतच अनेक विद्यार्थीचाही या पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान संवेदनशील पद्धतीने हे प्रकरण हाताळले जात असल्याचे भोयर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
याविषयी नागपूर विभागीय परीक्षा मंडळाने खबरदारीची पावले उचलणे सुरू केले आहे. मंडळाने संपूर्ण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यांना गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेपरफूट प्रकरणानंतर विभागातील सर्व जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि कस्टडीप्रमुखांची नुकतीच बैठक घेतली. परीक्षा संचालनाच्यादृष्टीने घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रश्नपत्रिकांचे सील प्रत्यक्ष वर्गखोलीतच उघडण्यात यावेत, याकडे लक्ष देण्यासही सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा देऊ दिली जाणार आहे. त्यानंतर, उत्तरपत्रिका तपासणीच्या वेळेस संबंधितांना पाचारण करून त्यांची चौकशी केली जाईल. त्यांना परीक्षा देण्यापासून अडवले जाणार नाही. चौकशीनंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे विभागीय मंडळाचे अध्यक्ष शिवलिंग पटवे यांनी स्पष्ट केले.