नागपूर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ते पदावरून विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 20 - 21 फेब्रुवारीचे विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे बघितले जात आहे. सध्या विदर्भातही ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात आहे. एकीकडे शिंदे आपली सेना भक्कम करताना उद्धव ठाकरे यांनी देखील आपले खासदार,आमदार पदाधिकारी टिकविण्याच्या दृष्टीने बैठकीतून सेव्ह टायगर मोहीम हाती घेतली आहे. या बाबतीत परखडपणे एक वाहिनीवर बोलताना किशोर तिवारी यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्या अंगलट आल्याचे दिसते.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून किशोर तिवारी यांना प्रवक्ते पदावरून पदमुक्त करण्यात येत असल्याचे विनायक राऊत यांनी या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंना शिवसेनत विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत मिलिंद नार्वेकर यासारख्या नेत्यांनी मातोश्री व सेना भवनावर ताबा मिळवून, विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत करण्यात जबाबदारी पार पडली. जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास लावणाऱ्या पोटभरु कावेबाज नेत्यांची आधी हकालपट्टी करा ही मागणी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केल्यावर तडका फडकी किशोर तिवारी यांची हकालपट्टी आज रात्री करण्यात आली आहे. जो माणूस सत्य बोलण्याचे धाडस करतो, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मागील पाच वर्षांपासून सतत राहून भाजपाच्या सर्व प्रवक्त्याना त्यांची जागा दाखविणाऱ्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला साधी सूचना न देता सरळ हकालपट्टी कितपत योग्य ? असा सवाल यानिमित्ताने तिवारी यांनी उपस्थित केला आहे.