Industrialist Manoj Jaiswal arrested
नागपूर पुढारी वृत्तसेवा
कोळसा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेले उद्योगपती मनोज जायस्वाल यांना 11,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. सध्या जायस्वाल यांची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे. कधीकाळी उच्चभ्रू लोकांनाही लाजवेल असे नागपूर, विदर्भातील मोठे साम्राज्य, प्रस्थ असलेल्या मनोज जयस्वाल यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता काळ आणि वेळ कुणालाच सोडत नसल्याचे पुन्हा एकदा खरे झाले आहे.
उद्योगपती निरव मोदी आणि विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या कर्जाएवढाच मनोज जायस्वाल यांचा कोळसा घोटाळा मोठा असल्याचा आरोप आहे. विविध बँकांकडून घेतलेल्या 11 हजार कोटी रुपयांचा निधी वेगवेगळ्या कामांसाठी त्यांनी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज हे या रकमेपेक्षाही जास्त झाले आहे. 2017 मध्ये मनोज जायस्वाल यांना सीबीआयने अटक केली होती आणि या प्रकरणात ते जामिनावर होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपला व्यवसाय आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे नेला होता.
सुमारे दहा वर्षांपूर्वी मनोज जायस्वाल यांनी बॉम्बार्डियर नावाचे एक विमान खरेदी केले. महाराष्ट्रात एवढे मोठे विमान घेणारे ते मोठे उद्योगपती होते. शेवटी हे विमानही त्यांनी कर्जाच्या पैशांतूनच घेतल्याचा आरोप आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे विमान नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर धूळ खात पडले आहे. अनेक कर्जदार बँकांनी हे विमान विकून जयस्वाल यांच्याकडील कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात कुणालाही यश आलेले नाही.
यूपीए सरकारच्या काळात झालेल्या कोळसा घोटाळा प्रकरणात तत्कालीन कोळसा मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल आणि मनोज जायस्वाल यांनी देशभरातील अनेक कोळसा खाणी अनुभव नसलेल्या उद्योगांना वितरित करण्यासाठी मोठी दलाली घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात ईडी आणि सीबीआयने देखील त्यांच्या विरोधात केसेस दाखल केल्या आहेत. आता या प्रकरणी पुढील तपासाकडे उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.