नागपूर : समाजात एकमेकांप्रती विश्वास, सकारात्मकता, सौहार्दता - एकता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक झाली तर आपला देश विश्वगुरू होईल. भारताला पुन्हा जुने स्वर्णीम दिवस येतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
ब्रम्हाकुमारीजच्या राज्यव्यापी अभियानाचा आज बुधवारी सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्र्वशांती सरोवर जामठा येथे शुभारंभ झाला. याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माऊंटआबू येथील ब्रह्माकुमारीजचे अतिरिक्त महासचिव बी. के. मृत्युंजय भाई, राजयोगिनी बी. के. चंद्रिका दीदी, नागपूर प्रमुख राजयोगिनी बी. के. रजनी दीदी आदी व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रनिर्मानासाठी नवचेतना जागृत करणारी ही छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक महापुरुषांची भूमी असा उल्लेख करीत राष्ट्रपती म्हणाल्या, सकारात्मक ऊर्जा,परस्पर विश्वास वाढला तरच देश पुढे जाईल.वर्तमानावर विश्वास ठेवत उज्ज्वल भविष्याची सकारात्मकता ठेवा, तंत्रज्ञानाचे युग असताना उत्तम smaj निर्मितीचे हे अभियान गावागावात एकता आणि विश्वास दृढ करेल यावर भर दिला. यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात पुरुषांना शिवध्वज आणि महिलाना कलश देण्यात आले. या मोहिमेसाठी ब्रम्हाकुमारीज मार्फत आठ सिध्दांत निश्चित करण्यात आले आहेत. यात गावागावात व्यसनमुक्त समाजाची निर्मिती, शाश्वत जीवन पध्दती, स्वच्छता व नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीत कर्तव्याचे भान, मानवतेसाठी कर्तव्यतत्परता, मूल्याधारीत शिक्षण, निर्मळ व संयमी जीवन- योगा, हरीत व शाश्वत महाराष्ट्र, सुसंवादातून आनंदी जीवन यावर भर दिला जाणार आहे.
राज्यातील प्रत्येक तालुका पातळीवरील ब्रम्हाकुमारीजच्या केंद्रामार्फत ही मोहीम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. राजपाल आचार्य देवव्रत यांनी भारताच्या मूळ संस्कृतीचा आधार वेद असून एकता आणि विश्वास असेल तिथे प्रगती कुणी थांबवू शकत नाही.2047 च्या विकसित भारताचा संकल्प हाच असल्यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, नेहमी सकारात्मक भावनेने वर्तमानात जगा,भूतकाळ विसरा, भविष्याची फार चिंता करू नका,आपण चांगले, जग चांगले या न्यायाने वागा असे आवाहन राजयोगिनी चंद्रिकादीदी यांनी केले. आजचा दिवस सुवर्णमयी असल्याचे मृत्युंजय भाई यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात अध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता आणि सकारात्मक विचार याला अनन्य साधारण महत्व असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक ब्रह्मकुमारी रजनीदीदी यांनी केले. प्रारंभी सर्व अतिथींचा स्मृतिचिन्ह, शाल देत सन्मान करण्यात आला.