हिंदू धर्म सार्वभौम, शाश्वत आणि ब्रम्हांडासोबत अस्तित्वात आला : सरसंघचालक मोहन भागवत file photo
नागपूर

हिंदू धर्म सार्वभौम, शाश्वत आणि ब्रम्हांडासह अस्तित्वात आलाय : मोहन भागवत

पुढारी वृत्तसेवा
राजेंद्र उट्टलवार

नागपूर : धर्म हा भारताचा स्वत्व आहे, धर्म नाही. अनेक धर्म आहेत, परंतु या धर्मांमागील धर्म आणि अध्यात्म, ज्याला आपण धर्म म्हणतो, ते भारताचे जीवन आहे. आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो कारण हा धर्म सार्वभौम, शाश्वत आणि या ब्रम्हांडासोबत अस्तित्वात आला आहे. हा धर्म शोधला नाही आणि कोणाला दिलाही नाही म्हणून आपण त्याला हिंदू म्हणतो, जो मानवता आणि जगाचा धर्म आहे. असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील विजयादशमी कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्भूषण डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित होते. आज जोरदार पावसाने पथसंचलन, शारीरिक कवायतीमध्ये काही बदल करावा लागला. शतकपूर्ती वर्ष, विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

भागवत म्हणाले, समरसता, सद्भावना पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी आणि नागरिक अनुशासन ही पंचसूत्री घेऊन संघाचे स्वयंसेवक येणाऱ्या काळात घरोघरी जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज जागतिक पातळीवर स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू असलेल्या संघर्षाचे दाखले देत जगात हिंदूधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म कसा ठरेल यावर सरसंघचालक भागवत यांनी भाषणात भर दिला. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपला देश पुढे जात आहे. सर्व क्षेत्रात भारत पुढे जात आहे. जम्मू-काश्मीर निवडणूका शांततेत झाल्या. भारताची प्रतिष्ठा वाढली. 'वसुधैव कुटुंबकम' हा आमचा विचार जगाने स्विकारला. आमचा योग जगासाठी फॅशन झाला. या मागचे शास्त्र जगाने स्वीकारले. पर्यावरणाच्या बाबतीत आमची दृष्टी जगात स्वीकारली जात आहे. सामाजिक बल वाढत आहे, या शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची अप्रत्यक्षपणे प्रशंसा केली. मात्र, भारत पुढे जाऊ नये यासाठीही काही शक्ती काम करीत आहेत. त्या दृष्टीने जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यासोबतच एकांगी विचाराचे, पर्यायी राजकारण या शब्दात काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला. कोलकाता घटनेवर अपराध आणि राजकारणाच्या आघाडीवर टीका केली. आज अनेक देश विघातक घटना घडत आहेत. बांगलादेशात काय झाले याची कारणे विविध असली तरी इतका मोठा संघर्ष सहज सोपा नाही, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. हिंदू अत्याचाराविषयीची चिंता व्यक्त केली. हिंदू समाजाने कुणाशी शत्रूत्व करायची नाही. मात्र दुर्बल राहू नका, असे आवाहन त्यांनी केले. भारत-बांगलादेशात संबंध बिघडवण्याचे, पाकिस्तानला सोबत घेण्याचे प्रयत्न काही शक्तीमार्फत केले जातात. या मागच्या शक्ती ओळखा, भारत मोठा झाला तर आपले देश विघातक उद्योग थांबतील ही भीती त्यांना आहे. सांस्कृतिक परंपरांच्या विरुद्ध हा विचार असल्याने ते उध्वस्त करणे हेच त्यांचे ध्येय असल्याचे सांगितले.

हिंदू धर्मच जगात सर्वश्रेष्ठ ठरेल

जगामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे त्यामुळे सशक्त समाज निर्मिती हे संघाचे ध्येय आहे.बलवान भारत म्हणून जगात आपली ओळख निर्माण करायची आहे. भारत सशक्त होत आहे. यासाठी तो इतरांच्या डोळ्यात खुपत आहे.आपल्या देशाचा मान वाढला. भारतीय नागरिकांची प्रतिष्ठा वाढली, या शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या धोरणांची प्रशंसा केली. संघटित समाजाचे बल हवे, शक्तीला दिशा हवी. सर्वांचे जीवन बदलेल, जगात हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ ठरेल असेच संघाचे विश्वव्यापी,सर्वस्पर्शी धोरण असल्याचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले. व्यक्तिगत, सामाजिक चरित्रावरच देश मोठा होतो याकडे लक्ष वेधले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT