नागपूर : ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी नागपुरातील हिंदू संमेलनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व इतर पुरावे विचारात घेऊन कायद्यानुसार पुढील कारवाई करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सीताबर्डी पोलिसांना दिला. यासंदर्भात येत्या ८ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.
राष्ट्रपित्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्यामुळे कुलश्रेष्ठ व संमेलन संयोजक निशांत गांधी यांच्याविरोधात बीएनएस कलम ३५३(१)(बी)(सी), ३५३(२) व ३५६ अंतर्गत एफआयआर नोंदवला जावा, याकरिता नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सिव्हिल लाइन्समधील चिटणीस सेंटर येथे 'हिंदू कल, आज और कल' विषयावर सकल हिंदू समाज संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात कुलश्रेष्ठ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्यावेळी त्यांनी सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या व दंगल भडकवण्याच्या उद्देशाने राष्ट्रपित्याविषयी विविध वादग्रस्त वक्तव्ये केली. राष्ट्रपित्याने पंडित लक्ष्मचार्य यांच्या 'ईश्वर तेरो नाम' गाण्याची चोरी केली. त्यामुळे ते या देशाचे राष्ट्रपिता होऊच शकत नाही, असे कुलश्रेष्ठ म्हणाले. परिणामी, २८ फेब्रुवारी रोजी सीताबर्डी पोलिस ठाण्यात आणि त्यानंतर ४ मार्चला पोलिस आयुक्तांना तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही, असा याचिकाकर्त्याचा आरोप आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. आकाश मून यांनी बाजू मांडली.